गीतध्वनीमुद्रणाने झाला मुहूर्त
‘कॉपी’ या चित्रपटाच्या निमित्ताने शैक्षणिक क्षेत्रातील वास्तव मांडण्याचा प्रयत्न करणाऱ्या दयासागर वानखेडे आणि हेमंत धबडे या दिग्दर्शक जोडीने आणखी एका वास्तवदर्शी चित्रपटाचा मुहूर्त केला आहे. ‘भारत आमचाही देश आहे…’ असं शीर्षक असलेल्या या चित्रपटाची निर्मिती ओवी फिल्म्सच्या बेनरखाली होणार आहे.
ओवी फिल्म्सच्या बेनरअंतर्गत निर्माता जय घोंगे ‘भारत आमचाही देश आहे…’ची निर्मिती करीत असून पूनम राणे, गणेश पाटील आणि सुनील घारे या चित्रपटाचे सहनिर्माते आहेत. या चित्रपटाचा मुहूर्त नुकताच जुहू येथील आजीवासन स्टुडिओमध्ये गीत ध्वनीमुद्रणाने करण्यात आला.
“चंदनात पोरका, बाभळीत पोरका, उसन्या मीठाच्या विस्तवात पोरका…’’ हे राहुल सिद्धार्थ साळवे यांनी लिहिलेलं गाणं यावेळी रेकॉर्ड करण्यात आलं. रोहन प्रधान यांच्या आवाजात ध्वनीमुद्रित करण्यात आलेल्या या गाण्याला रोहन-रोहन या संगीतकार दुकलीने संगीत दिलं आहे. याप्रसंगी दिग्दर्शक-अभिनेते विजय पाटकर उपस्थित होते.
या चित्रपटाचं शीर्षक उत्सुकता वाढवणारं असल्याचं वक्तव्य यावेळी विजय पाटकर यांनी केलं. “चंदनात पोरका…’’ या गाण्यात रोहन-रोहन यांनी जॅझचा वापर केला आहे. मराठीत प्रथमच अशा प्रकारच्या गाण्यामध्ये जॅझचा वापर करण्यात आल्याचं मत रोहन-रोहन यांनी व्यक्त केलं. एक वेगळा प्रयोग केला आहे, जो संगीतप्रेमींना नक्कीच आवडेल अशी आशाही रोहन-रोहन यांनी व्यक्त केली. निर्माता-दिग्दर्शकांच्या सहकार्यामुळेच अशा प्रकारचा नावीन्यपूर्ण प्रयोग करण्याचं स्वातंत्र्य मिलाल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं.
‘भारत आमचाही देश आहे…’ हा चित्रपट आपल्या देशातील प्रत्येक स्तरावरील उपेक्षित, वंचितांच्या मनातील भावना व्यक्त करणारा असल्याचं दिग्दर्शक द्वयींचं म्हणणं आहे, ते म्हणाले, “आम्हाला जगू द्या, अशी आर्त हाक या चित्रपटाच्या माध्यमातून मारण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे. समाजातील वंचित घटकांनाही जगण्याचा हक्क आहे. भारत देश केवळ काही ठराविक वर्गाचा नसून वंचितांचाही असल्याची भावना या चित्रपटाद्वारे मांडण्यात येणार आहे.’’
दयासागर वानखेडे यांनी या चित्रपटाची कथा आणि संवादलेखन केलं आहे. हेमंत धबडेंसोबत वानखेडे यांनी या चित्रपटाची पटकथाही लिहिली आहे. मिलिंद शिंदे, कैलाश वाघमारे, जगन्नाथ निवंगुणे व शिवाजी पाटणे या कलाकारांच्या या चित्रपटात प्रमुख भूमिका आहेत. केमेरामन सँटिनिओ टेझिओ या चित्रपटाचे छायालेखन करणार आहेत. कला दिग्दर्शन संदीप कूंचीकोरवे करणार असून रंगभूषा इलियाज शेख यांची असेल. सलिल अमृते पार्श्वसंगीत देणार आहेत, तर संजय इंगळे संकलन करणार आहेत. वैशाली देशमुख या चित्रपटातील व्यक्तिरेखांना वेशभूषा करणार असून प्रतीक तरडे, रवी हराळे आणि साकेत चौधरी या चित्रपटाची निर्मिती व्यवस्था पाहणार आहेत. रवी धवने या चित्रपटाचे पब्लिसिटी डिझायनर आहेत.