कलर्स मराठीवर ‘तू माझा सांगाती’चे नवे पर्व
‘तू माझा सांगाती’ मालिकेमध्ये प्रेक्षकांना तुकारामांची विठूरायावर असलेली निस्सीम भक्ती बघायला मिळाली. आता मालिकेचे नवे पर्व सुरु होणार आहे. पहील्यांदाच महाराष्ट्राचा लाडका अभिनेता म्हणजेच भरत जाधव विठ्ठ्लाच्या भूमिकेत तर स्मिता शेवाळे रखुमाईच्या भूमिकेत दिसणार आहे.
प्रेक्षकांना या पर्वामध्ये तुकारामांच्या मुखी विठ्ठल–रखुमाईची संसारगाथा ऐकायला मिळणार आहे. ‘तू माझा सांगाती’ पर्व दुसरे – विठ्ठल रखुमाईची संसारगाथा ६ सप्टेंबरपासून सोम ते शनि संध्या ७.३० वा. फक्त कलर्स मराठीवर सुरु होत आहे.
विठ्ठल म्हणजे कृष्णाचं रूप, पण यामागेदेखील आख्यायिका आहे. असे म्हणतात कि, रुक्मिणी काही कारणास्तव कृष्णावर रुसली आणि द्वारका सोडून पृथ्वीतलावर आली. आपल्या रुसलेल्या पत्नीच्या शोधात कृष्ण विठूरायाच रूप घेऊन पृथ्वीवर आला. पण, नव्या रुपात समोर उभ्या ठाकलेल्या कृष्णाला रुक्मिणी ओळखूच शकली नाही. आपल्या चतुर बोलण्याने विठ्ठ्लाने रुक्मिणीचे मन जिंकले आणि तिचा सखा बनला. पण, असं काय झालं कि रुक्मिणी द्वारका सोडून पृथ्वीतलावर आली? सत्यभामा आणि रुक्मिणीचे नाते कसे होते? पूर्णपुरूष म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कृष्णाकडून कोणती चूक घडली? रुक्मिणीला कृष्ण म्हणजेच विठ्ठल आहे हे सत्य कळेल तेंव्हा काय होईल? कृष्ण आपल्या पत्नीचा राग कसा शांत करेल? हे बघणे नक्कीच रंजक असणार आहे.
या मालिकेविषयी बोलताना कलर्स मराठी प्रमुख Viacom18 निखील साने म्हणाले, “रंगमंच्याचा हुकमी एक्का ठरलेला, तसेच निव्वळ विनोदच नव्हे तर आशयपूर्ण भूमिकादेखील तितक्याच ताकदीने साकारलेला कलाकार म्हणजे भरत जाधव. अश्या गुणी कलाकाराडून ‘महाराष्ट्रचं आराध्य दैवत’ असलेल्या विठ्ठलाची भूमिका प्रेक्षकांना ‘तू माझा सांगाती’ या मालिकेमध्ये बघायला मिळणार आहे. कुठलीही भूमिका सहज, सुंदरपणे साकारून प्रेक्षकांच्या हृदयात स्थान मिळवणे हा भरतचा हातखंड आहे. मुळातच त्याच्या स्वभावात भाऊकता, कारुण्य, आपलेपणा आहे जे विठ्ठलाच्या ठायी पण आहे आणि या भूमिकेसाठीदेखील ते अतिशय महत्वाचे आहे. त्यामुळे आम्ही भरत जाधवला एका वेगळ्या भूमिकेत प्रेक्षकांसमोर आणत आहोत.”
महाराष्ट्राचा लाडका अभिनेता भरत जाधव पहील्यांदाच पौराणिक मालिकेमध्ये काम करत आहे ज्यांच्या बरोबर प्रेक्षकांना स्मिता शेवाळेदेखील असणार आहे. या दोघांनी याआधी एकत्र बरेच काम केले असून हा अनुभव नक्कीच वेगळा असणार आहे, कारण या मालिकेमध्ये महाराष्ट्राच्या श्रध्दास्थानी असलेल्या विठ्ठल आणि रुक्मिणीची भूमिका हे दोघ साकारणार आहेत.
याविषयी बोलताना भरत जाधव म्हणाले, “मी खूप खुश आहे कि, मला ही भूमिका साकारण्याची सुवर्णसंधी मिळाली. कलर्स मराठीकडून जशी ही भूमिका माझ्याकडे आली मी लगेच माझा होकार कळवला. याच महत्वाचं कारण असं कि, आमच्या घरी गेल्या बऱ्याच वर्षांपासून गोकुळाष्टमीचा सण साजरा केला जातो. त्याचाच हा आर्शिवाद असावा असं मला वाटत, ज्यामुळे मला कृष्णाचंच दुसरे रूप असलेल्या विठ्ठलाची भूमिका करण्याची संधी मिळाली. तसेच विठ्ठल म्हणजे सर्वसामान्यांचा देव जो फक्त भाव भक्तीचा भुकेला आहे. अश्या या महाराष्ट्राच्या लाडक्या विठ्ठलाची मला भूमिका करायला मिळत आहे हे मी माझे भाग्यच समजेन”.