प्रेमात पाडणारं धम्माल विनोदी नाटक
‘लग्नलॉंजी’, ‘स्पिरीट’, ‘अबीर गुलाल’, ‘आम्ही सारे फर्स्टक्लास’, ‘आलाय मोठा शहाणा’ हया यशस्वी नाटकानंतर निर्माते अशोक दगडू शिगवण तृप्ती प्रॉडक्शनच्या बॅनरखाली “दिल तो बच्चा है जी” हे धमाल विनोदी नाटक घेऊन आले आहेत.
अक्षय जोशी लिखित आणि अनेक यशस्वी नाटकं दिग्दर्शित करणारे तसेच एक उत्कृष्ट अभिनेता म्हणून सर्व परिचित असलेले प्रसाद खांडेकर हे या नाटकाचे दिग्दर्शन करीत आहेत. यात सुशील इनामदार, प्रसाद खांडेकर आणि पंढरीनाथ (पॅडी) कांबळे या हुकमी विनोदी अभिनेत्यांची अभिनयाची जुगलबंदी पाहायला मिळणार आहे. सध्या या नाटकाची तालीम जोरात सुरू असून येत्या ११ ऑगस्टला हे नाटक रंगभूमीवर येत आहे.
“दिल तो बच्चा है जी” या नाटकात तीन मित्रांची आणि त्यांच्यावर प्रेम करत असलेल्या त्याच्या बायकांची गोष्ट अगदी सहजपणे आणि गंमतशीरपणे मांडली आहे. तीन जीवलग मित्र, त्यांच्यामधील होणारी चर्चा, त्या चर्चेचं स्वप्नरंजन, त्यानंतर होणारा संशयकल्लोळ आणि शेवटी प्रेमाची कळालेली खरी किंमत, या सर्व घडामोडी प्रेक्षकांना मनमुराद हसायला लावतील. अभिनेता पंढरीनाथ कांबळे म्हणजेच आपल्या सर्वांचा लाडका ‘पॅडी’ या नाटकाद्वारे चार वर्षांनंतर पुनरागमन करीत आहे. आपल्या सर्वांगसुंदर अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणारे पंढरीनाथ कांबळे, सुशील इनामदार व प्रसाद खांडेकर या नाटकात प्रमुख भूमिकेत असून त्यांच्या विनोदाचा आविष्कार या नाटकात पाहायला मिळणार आहे. त्यांच्यासोबत रसिका वेंगुर्लेकर, अंतरा पाटील, अदिती भास्कर यांच्याही प्रमुख भूमिका असून ओमकार पनवेलकर याने छोटीशी भूमिका साकारली आहे.
लेखक अक्षय जोशी यांनी सांगितले की, ही तीन मित्रांची गोष्ट असून बायकोच्या प्रेमात पडायला लावेल अशी ही कलाकृती आहे. दिग्दर्शक प्रसाद खांडेकर यांनी सांगितले की, ही कलाकृती निर्माण करताना हाच विचार होता की हे नाटक प्रत्येकाला रिलेट व्हायला लावेल अशाच पद्धतीचे असायला हवे. हे नाटक प्रत्येकाला त्याची गोष्ट वाटेल असेच आहे. निर्माता म्हणून भूमिका मांडताना अशोक दगडू शिगवण यांनी सांगितले की, ही कलाकृती आजवरच्या आम्ही केलेल्या नाटकापेक्षा वेगळी आणि भन्नाट आहे. आणि ती साकारण्यासाठी सगळ्यांनीच मेहनत घेतली आहे. हे नाटक रंगभूमीवर वेगळा प्रयोग घेऊन येत आहे. हे नाटक फक्त विनोदी नाही तर त्यातून एक संदेश मांडण्याचा आम्ही प्रयत्न केला आहे. या नाटकाचं वैशिष्ट्य म्हणजे या नाटकात दहा नृत्यमय गाणी असून, ती प्रसंगानुरूप समाविष्ट करण्यात आली आहेत. ही गाणी अमिर हडकर यांनी वेगवेगळ्या प्रकारात संगीतबद्ध करून नाटकात वेगळीच मजा आणली आहे. नृत्य दिग्दर्शनाची बाजू संपदा जोगळेकर यांनी सांभाळली आहे. या नाटकाचे नेपथ्य संदेश बेंद्रे, रंगभूषाकार शरद सावंत, वेशभूषा रसिका वेंगुर्लेकर, प्रकाश योजना शितल तळपदे यांची असून सूत्रधार गोट्या सावंत आहेत. आपणा सर्वांच्याच आयुष्यात घडत असलेल्या घटनांचा कानोसा घेणारं हे मजेशीर नाटक लवकरच रसिकांच्या भेटीस येत आहे.