‘सारेगमप’मध्ये सुरु होणार चुरशीची लढत
तुफानाशी थेट पंगा घेत शीड उभं करुन वाट काढणाऱ्या लढवय्यांसाठी आहे यंदाचं सारेगमपचं पर्व..! ‘घे पंगा कर दंगा’ म्हणत हे आव्हान पेलण्यासाठी जसे स्पर्धक सज्ज होते तसेच परीक्षक, निवेदक, वादक आणि झी मराठी सुद्धा. झी मराठी सारेगमपच्या आजवरच्या पर्वांनी प्रेक्षकांच्या मनात घर केलंय. तब्बल चार वर्षांनी नवं पर्व घेऊन येताना उत्साह आणि जोश तोच असला तरी यंदाचं पर्व तरुणाईची भाषा बोलणारं आहे. संगीताच्या मैदानात स्पर्धक एकमेकांशी सुरेल पंगा घेऊन करणार आहेत धमाल दंगा!
चार वर्षांनी सारेगमपचं पर्व घेऊन येताना काय नवं असावं हा विचार करताना ‘घे पंगा कर दंगा’ ही थीम ठरवण्यात आली आहे. केवळ सात सूरांची जाण असणारा नाही तर त्या सुरांच्या साथीने आव्हान झेलणारा ताकदीचा सुपरस्टार शोधणं, हा या पर्वाचा मुख्य उद्देश आहे. सारेगमपच्या लिट्ल चॅम्पसमध्ये ज्याने नेहमीच प्रयोगशीलतेवर भर ठेवला असा सर्वांचा लाडका तरुण-तडफदार गायक-संगीतकार रोहित राऊत यंदाच्या पर्वात निवेदकाची भूमिका साकारतोय.
झी मराठी सारेगमपचे परीक्षक हा नेहमीच औत्सुक्याचा विषय ठरलाय. अनेक मान्यवरांनी सारेगमपच्या मंचावरून महाराष्ट्राच्या गानरत्नांना मार्गदर्शन केलं आहे. यंदाच्या युथफुल पर्वासाठीही तरुणाईची भाषा जाणणारे आणि त्याचबरोबर संवेदनशील मराठी प्रेक्षकांच्या मनाला हात घालणारे परीक्षक लाभले आहेत. ज्याच्या चित्रपटात संगीत ही नेहमीच जमेची बाजू राहिली आहे असा हिंदी-मराठी चित्रपटसृष्टीतील राष्ट्रीय पुरस्कार विजेता दिग्दर्शक रवी जाधव या पर्वासाठी परीक्षक म्हणून आपल्या समोर आला आहे. सुरांनाही जिची मोहिनी पडावी अशी अलबेली बेला स्पर्धकांना पारखून त्यांच्या गाण्यातले बारकावे सांगून त्याचं मार्गदर्शन करतेय आणि आता या मान्यवरांमध्ये भर पडली आहे, हिंदी-मराठी नाट्य-चित्रपटसृष्टीतील प्रख्यात गीतकार-संगीतकार-लेखक-गायक राष्ट्रीय पुरस्कार विजेते स्वानंद किरकिरे! स्वानंद किरकिरे यांच्या एंट्रीमुळे सारेगमपच्या या पर्वाला परिपूर्ण परीक्षकांची टीम लाभली आहे, असं म्हणणं वावगं ठरणार नाही.
रवी जाधव आपलं मतं व्यक्त करताना म्हणतो, ‘पुढच्या फेरीसाठी निवडण्यात आलेल्या गायकांमधून कोणाचा आवाज सिनेमाच्या पार्श्वगायनसाठी अधिक योग्य आहे, याचा शोध मी घेत राहणार आहे. बेला स्वतः उत्तम गायिका आहे, स्वानंद उत्तम लेखक व गायक आहे आणि मी दिग्दर्शक आहे. मला वाटतं की आमची उत्तम टीम जमली आहे, लेखक, गायिका आणि दिग्दर्शक. जो सिनेमॅटिक आवाज लागतो, त्या आवाजाचे जे मॅजिक असते, ते शोधायचा मी प्रयत्न करतोय.’
नव्या परीक्षकाच्या भूमिकेतून आपल्याला भेटायला येणारे स्वानंद किरकिरे सांगतात, ‘मी ऐकलं आहे की खूपच सुरेल स्पर्धक अवघ्या महाराष्ट्रामधून निवडण्यात आले आहेत आणि त्यांचं परीक्षण करणं, हे माझ्यसाठी नक्कीच उत्सुकतेचं ठरणार आहे.’
बेला शेंडे म्हणतात, ‘सारेगमप हा फक्त एक सिंगिंग रिऍलिटी शो नसून हा सुरांचा महायज्ञ आहे. आपली कला जगासमोर सादर करण्याची सुवर्णसंधी देणारा, मराठी मनांना आपलासा वाटणारा हा मंच आहे. महाराष्ट्रातल्या तरुणाईची ही अफाट ऊर्जा पाहून मी थक्क झाले. स्पर्धकांना मार्गदर्शन करताना, त्यांचे विचार जाणून घेताना मलाही खूप शिकायला मिळतंय. परीक्षकाची ही भूमिका मी खरंच खूप एन्जॉय करतेय. या पर्वात स्वरांचा हा दंगा महाराष्ट्रभर धुमाकूळ घालणार एवढं मात्र नक्की.’
औरंगाबाद, नागपूर, पुणे, मुंबई, गोवा, कोल्हापूर अशा वेगवेगळ्या शहरांमध्ये ‘सारेगमप – घे पंगा कर दंगा’साठी ऑडिशन झाल्या आणि प्रत्येक शहरातून २५०० ते ३००० पेक्षा अधिक स्पर्धकांनी सहभाग घेतला. प्रत्येक शहरातला उत्साह आणि टॅलेंट थक्क करणारं होतं. या ऑडिशनदरम्यान जाणवलेली एक चांगली गोष्ट म्हणजे येणारे स्पर्धक पंगा घेण्याच्या तयारीनेच आले होते. उत्तम गायकांसोबत काही धमाल पात्रही पाहायला मिळाली. त्यामुळे हे ऑडिशन राऊंड खऱ्या अर्थाने मनोरंजनाची मेजवानी ठरले. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यांतून निवडलेल्या ८४ स्पर्धकांना मुंबईला बोलावलं गेलं. आता खरं चॅलेंज होतं की या उत्तम गायकांमधून सर्वोत्तम ३६ निवडणं. आता सारेगमपची ही पुढील वाटचाल अधिक रोमांचक आणि चुरशीची होणार यात शंका नाही. महाअंतिम सोहळ्याच्या दिशेने सुरु होणारा हा सांगीतिक प्रवास अधिक मनोरंजक होणार आहे. दर सोमवार-मंगळवार रात्री ९:३० वाजता, झी मराठीवर पाहायला विसरू नका, सारेगमप – घे पंगा कर दंगा!