वर्षा उसगावकर-अमितराज चार वर्षानंतर पुन्हा एकत्र!
दुनियादारी चित्रपटानंतर तब्बल ४ वर्षांनी अभिनेत्री वर्षा उसगावकर आणि संगीत दिग्दर्शक अमितराज ‘जळू’ चित्रपटाच्या निमित्ताने आपणास पुन्हा एकत्र काम करताना दिसून येणार आहेत.
निर्माते अजितकुमार धुळे आणि श्रीनिवास बिहाणी यांच्या ‘साई नक्षत्र’ निर्मित जळू चित्रपटाचा मुहूर्त सोहळा नुकताच पार पडला. यावेळी अभिनेत्री वर्षा उसगावकर, रश्मी राजपूत, अभिनेते कमलेश सावंत, संगीत दिग्दर्शक अमितराज उपस्थित होते.
एकविसाव्या शतकातील स्त्रीने स्वत:ची शक्ती ओळखली आहे. स्त्री ही त्याग, नम्रता, श्रद्धा व सुजाणपणा याची मुर्ती समजली जात असली तरीही आजच्या आधुनिक युगात स्त्री डॉक्टर, इंजिनिअर, शास्त्रज्ञ, प्रशासकीय अधिकारी व आमदार अश्या महत्वाच्या पदांवर काम करून पारंपारिकरित्या पुरूषांची समजली जाणारी क्षेत्रे महिला काबीज करत असलेली दिसून येते. आजची स्त्री स्वतःची कर्तबगारी जगाला दाखवून देण्यास सज्ज आहे. अशावेळी अनेक सामाजिक आव्हानांचा तिला सामना करावा लागतो. समाजावरील पुरुषप्रधान संस्कृतीचा असलेला प्रभाव अजूनही स्त्रीभ्रूण हत्या, लैंगिक शोषण, अॅसिड अटॅक या स्वरूपात स्त्री वर्गाला अत्याचार करू पाहतो. भारतासारख्या पुरुषप्रधान देशात स्त्रियांना स्वतंत्रपणे निर्णय घेण्याचा अधिकार प्राप्त होणे म्हणजेच महिला सक्षमीकरण असे मानणाऱ्या समाजाला महिला सक्षमीकरण म्हणजे नक्की काय? महिला सक्षमीकरण व महिला सशक्तीकरण होणे ही काळाची गरज कशी आहे? या विषयावर भाष्य करून बदलत्या समाजाबरोबर स्त्रियांना त्यांचे व्यक्तिस्वातंत्र्य, अधिकार, महत्वाकांक्षा, दृष्टिकोन यांची जाणीव करून देणारा ‘जळू’ हा वास्तववादी चित्रपट समस्त स्त्री वर्गाला प्रेरणादायी ठरणार आहे.
भारतातीलच नव्हे तर जगभरातील प्रत्येक स्त्रीला स्वतःच्या अस्तित्वाचा शोध घेण्यास भाग पडणाऱ्या, निर्माते अजितकुमार धुळे आणि श्रीनिवास बिहाणी यांच्या ‘साई नक्षत्र प्रोडक्शन’ निर्मित ‘जळू’ चित्रपटाची कथा अजितकुमार धुळे आणि सागिरा पटेल यांची असून पटकथा तेजस तुंगार यांनी लीहिली आहे. सी.आय.डी, आहट, मधली सुट्टी, कॉमेडी एक्सप्रेस यांसारख्या एकापेक्षा एक मालिकांचे संकलक निखिल भोसले यांच्यासोबत अजित कुमार धुळे दिग्दर्शनाची जबाबदारी पार पडणार आहेत.
चित्रपटातील गीते अजितकुमार धुळे, किशोर गागरे, किरण डोंगरदिवे, महेश ससाणे यांनी लिहिली असून नितीन चांदोरकर हे कार्यकारी निर्मिता म्हणून जबाबदारी पार पडणार आहेत. चित्रपटातील सर्व गाणी संगीत दिग्दर्शक अमितराज संगीतबद्ध करणार असून, नृत्य दिग्दर्शिका फुलवा खामकर नृत्यदिग्दर्शन करणार आहे.