लग्नाचा योग जुळवून आणणारे मंगलमय नाटक
लग्नाचा योग जुळवून आणणारे मंगलमय नाटक “जमलं रे जमलं… आता लग्न होणारच !” हे नाटक लवकरच रंगभूमीवर येत आहे. आर्वी थॅंक्स एंटरटेनमेंट व सिद्धांत प्रॉडक्शन्स प्रस्तुत, निर्माते – दिग्दर्शक व लेखक रमेश वारंग यांनी हे नाटक रंगभूमीवर आणले असून शुभारंभाचा प्रयोग येत्या दि. १४ फेब्रुवारी रोजी दुपारी ४.३० वाजता गडकरी रंगायतन, ठाणे येथे होणार आहे.
‘लग्न’ हा सर्वांच्या आयुष्यातील महत्वाचा क्षण आणि अपरिहार्य घटक. लग्नाच्या गाठी स्वर्गात जुळल्या जातात असं आपण म्हणत असलो तरी भूतलावर प्रत्यक्षात लग्न जुळवताना वधू – वरांच्या पालकांची काय अवस्था होते ते सांगणे कठीणच ! प्रत्येक पालकांना आपली होणारी सुन किंवा जावई चांगल्या घरातला असावा, सुसंस्कृत असावा असेच वाटते. वधू – वरांनाही आपला जोडीदार असाच असावा हीच अपेक्षा असते. मात्र आजच्या तरुणाईची लग्न हया विषयावरील संकल्पनाच बदलली आहे. आपला भावी जोडीदार कसा असावा हयाविषयी त्यांची मनं व मतं बदलली असून त्यांच्या अपेक्षा ही वाढल्या आहेत. आणि त्यामुळे त्यांची लग्न जुळत नाहीत.
‘जमलं रे जमलं… आता लग्न होणारच !’ हे लग्न जुळवण्याचा प्रयत्न करणार्या प्रत्येक कुटुंबासाठी प्रेरणा देणारे सकारात्मक नाटक आहे. या नाटकाच्या अनुषंगाने लग्न जुळवताना येणार्या अडचणी, त्यासाठी करावा लागणारा संघर्ष, लग्नानंतर पती – पत्नीमध्ये होणारा दुरावा, त्यांचे उडणारे खटके, घटस्फोट आदी महत्वाच्या प्रश्नांवर प्रकाश टाकला आहे. खूप वर्षे झाली तरी बर्याच जणांचे विवाह होत नाहीत, त्यामागची कारणे कोणती ? काहींना योग जुळून येत नाही. काहींना अनेक कारणांमुळे भावी जोडीदार पसंत पडत नाही. अशा अनेक कारणांचा दिग्दर्शक रमेश वारंग यांनी या नाटकातून उकल करण्याचा प्रयत्न केला आहे.
या नाटकाची निर्मिती, दिग्दर्शन आणि लेखन रमेश वारंग यांनी केले आहे. सुधाकर नार्वेकर यांनी निर्मिती सहाय्य केले असून संगीत संयोजन विलास दाते यांचे आहे. नेपथ्य संतोष नागोटकर यांचे असून सुत्रधार शेखर दाते हे आहेत तर उद्धव रिसबुड व सोनल पवार यांनी विशेष सहकार्य केले आहे. यात मनाली गुरव, भाग्यश्री मुथूवार, सोनल जाधव, सपना खाड्ये, प्रिया हिप्परगी, प्रणाली खांबे आणि रमेश वारंग यांच्या प्रमुख भूमिका आहेत. विविध जातींची, उच्चशिक्षित, शिक्षित, घटस्फोटीत, अनेक ठिकाणी नावे नोंदवून सुद्धा लग्न जमत नसलेल्या कुटुंबासाठी नव्या आशेचा किरण दाखवणारा हा नाट्यमय कार्यक्रम आवर्जून पहावा असाच आहे.
रमेश वारंग हया नाट्यवेड्या धडपडया तरुणाने नाट्यसृष्टीत सतत काहींना काही करायचा चंग बांधला आहे. त्याच अनुषंगाने त्याने याआधी वेगळ्या आशयाचे “एक चावट मधुचंद्र”, “नेता आला रे” आणि ४० वर्षावरील प्रोढांना घेऊन “अभी तो हम जवान है” हया नाटकांची यशस्वी निर्मिती केली आहे. तसेच “छोटा भीम” आणि “माय आयडॉल डॉ. अब्दुल कलाम” हया दोन बालनाट्याचीही निर्मिती केली आहे. सध्या त्यांचे “ही स्वामींची इच्छा” हे नाटक जोरात सुरू असून त्याला प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.