बदलत्या काळातल्या बदलत्या नातेसंबंधाची गोष्ट
स्टार प्रवाहच्या ‘नकळत सारे घडले’ या मालिकेतील छोट्या परीनं प्रत्येकाच्या मनात घर केलं आहे. गंमतीची गोष्ट म्हणजे, १०० हून अधिक ऑडिशननंतर ही परी सापडली.
सांस्कृतिकदृष्ट्या महाराष्ट्राशी नातं सांगणाऱ्या ‘स्टार प्रवाह’च्या मालिकांमध्ये ‘नकळत सारे घडले’ या मालिकेच्या रुपानं महत्त्वपूर्ण भर पडली आहे. या मालिकेची कथा आहे परीची. लडिवाळ आवाजात तिनं विचारलेल्या ‘मी तुला आई म्हणू…?’ या तिच्या प्रश्नानं अवघ्या महाराष्ट्राचं लक्ष वेधून घेतलं आहे.
‘नकळत सारे घडले’ या मालिकेची मूळ संकल्पना आहे स्टार प्रवाह क्रीएटीव्ह टीमची. स्टार प्रवाहने अभिनेता स्वप्नील जोशीच्या जिसिम्स या संस्थेला या मालिकेची निर्मिती करायची संधी दिली. बदलत्या काळातल्या बदलत्या नातेसंबंधाची गोष्ट या मालिकेत उलगडणार आहे.
हरीश दुधाडे, नुपूर परुळेकर, अनुराधा राजाध्यक्ष, सुदेश म्हशीलकर, सुरेखा कुडची अशा उत्तम स्टारकास्टची निवड स्टार प्रवाहने केली आहे. मात्र, मालिकेचे प्रोमो सुरू झाल्यापासून छोटी परी चर्चेत आहे. महत्त्वाची गोष्ट म्हणजे, १०० हून अधिक ऑडिशन घेतल्यानंतर ही परी सापडली.
परीच्या निवडीविषयी स्टार प्रवाहचे प्रवक्ते म्हणाले, ‘आम्हाला या भूमिकेसाठी अतिशय निरागस चेहऱ्याची मुलगी हवी होती. मात्र आताच्या काळात लहान मुलं आपल्या वयापेक्षा जास्त मॅच्युअर दिसतात आणि वागतात जे आम्हाला नको होतं. महाराष्ट्रभरातून आलेल्या १००हून अधिक छोट्या मुलींची आम्ही ऑडिशन घेतली. मात्र, कुणीच योग्य वाटेना. अचानक एका ऑडिशनमध्ये ही परी सापडली. ती ज्या आत्मविश्वासानं ऑडिशनला उभी राहिली, ते पाहूनच आम्ही तिला निवडलं. ती खूप गोड आहे, निरागस आहे आणि महत्त्वाचं म्हणजे लहान मुलांसारखीच आहे. ही परी प्रेक्षकांच्या मनात घर करणार, ही आमची खात्री आहे’.
गाडी, बंगला, नोकर, सगळं आहे परीकडे, पण आईची माया ती सगळ्यांमध्ये शोधते. मिळेल का कधी तिला मायेची उब? या छोट्या, लाघवी परीचा प्रवास न चुकता पहा ‘नकळत सारे घडले’ मध्ये सोमवार ते शनिवार सायं. ७:३० वाजता फक्त स्टार प्रवाहवर!