जागतिक रंगभूमीदिनानिमित्त ठाण्यात नाट्य महोत्सव
दिल्ली, मुंबई आणि पनवेल येथे यापूर्वी तीन नाट्य महोत्सवझाल्यानंतर चौथा नाट्य महोत्सव २७, २८ आणि २९ मार्च २०१८ रोजी तिन्ही दिवस सकाळी ११.३० वाजता गडकरी रंगायतन, ठाणे येथे होणार आहे. या तीनही नाटकांचे लेखन-दिग्दर्शन ‘रंगचिंतक मंजुल भारद्वाज’ यांनी केले असून या कलात्मक चळवळीला आपल्या कलेने मंचावर साकार करणारे कलाकार आहेत, अश्विनी नांदेडकर, योगिनी चौक, सायली पावसकर, कोमल खामकर, तुषार म्हस्के आणि बबली रावत. या महोत्सवामागची भूमिका सांगताहेत रंगचिंतक मंजुल भारद्वाज....
२७ मार्च हा “विश्व रंगमंच दिवस” म्हणून ओळखला जातो. विश्व आणि रंगमंच यांचं एक अनोखं नातं आहे. विश्व हेच रंगमंच आणि रंगमंच हेच विश्व असं म्हंटलं जातं. आज संपूर्ण विश्वासमोर अनेक आव्हाने आ वासून उभी आहेत आणि त्यातील सर्वात मोठं आव्हान आहे “माणुसकी वाचवणे” म्हणूनच, माणूस बनण्याची संवेदना जागवणारे नाटक “गर्भ” हे या कलात्मक महोत्सवात सादर होणारे पहिले नाटक आहे.

विश्वाला माणुसकीचे भान देणारी कला आणि कलाकारंचं असतात आणि ‘अनहद नाद’ याच कलेला आणि कलाकारांना बाजारीकरणातून उन्मुक्तता देणारं रंगचिंतन आहे. भांडवलवादी व्यवस्था, खरेदी-विक्री या तत्वावर वर्षानुवर्षांपासून जे करत आली आहे, त्याविरोधात आवाज उठवणारे हे नाटक “अनहद नाद – Unheard sounds of Universe” तसेच सततचा संघर्ष आहे, न्यायसंगत समाजरचनेचा निर्माण करणे, अर्ध्या लोकसंख्येचा संदर्भ म्हणजे नाटक, “न्याय के भंवर में भंवरी” कला ही माणसाला समृद्ध करत असते. मानवी संवेदना जागवून माणसाला माणूस बनवण्याची ताकद ही कलेतच आहे हा विश्वास असल्याने 27 मार्च या जागतिक रंगमंच दिवशी “थिएटर ऑफ रेलेवन्स” या तत्वज्ञानाचे ‘अभ्यासक कलाकार’ ‘कलात्मक नाट्य महोत्सव’ घेऊन येत आहेत!

या नाट्य महोत्सवाचे वैशिष्ठय म्हणजे हा संपूर्ण महोत्सव जन सहयोगाने उभा राहणार आहे! कलाकाराची ताकद म्हणजे त्याचे हक्काचे प्रेक्षक! हे प्रेक्षक उभे राहणार, पाठींबा देणार आणि २७, २८, २९ मार्च २०१८ रोजी प्रेक्षक सहयोगाने एक कलात्मक नाट्य महोत्सव संपन्न होणार, कलाकारासाठी यापेक्षा आनंदाची गोष्ट दुसरी कोणती असू शकते…
कोणताही कार्यक्रम करायचा वा नाटक उभे करायचे तर भांडवल लागतं, पैसा अनिवार्य आहे पण हा कलात्मक नाट्य महोत्सव कोणत्याही निर्मात्याची, मध्यस्थाची मदत न घेता स्वतःच्या पायावर उभा राहिला आहे, “कला उद्योजकता” या संकल्पनेच्या जोरावर! या प्रक्रियेत महोत्सवातील कलाकार स्वतः प्रेक्षकांना जाऊन भेटतात, त्यांना नाटकाची संकल्पना समजावून देतात, या प्रक्रियेने मुख्य म्हणजे कलाकार आणि प्रेक्षक यांत ‘संवाद’ होतो. जो संवाद आजच्या काळात अत्यन्त महत्वाची भूमिका बजावतो. आज जिथे एकमेकांकडे बघून स्मित हास्य करायलाही वेळ नाही तिथे थिएटर ऑफ रेलेवन्सचे कलाकार प्रेक्षकांना भेटून संवाद करत आहेत आणि भेट घेतली की, ही संवाद प्रक्रिया वाढीस लागते, संवादाने विचार प्रक्रिया भक्कम व्हायला लागते आणि संकल्पना आवडली तर प्रेक्षक स्वतः कलाकारांकडून सहयोग पत्र (तिकीट) घेतात आणि नाटकाची सहयोग राशी जमा करतात. सहयोग राशी याकरिता, कारण या नाटकाला कोणताही निर्माता किंवा स्पॉन्सरर्स नाही तसेच कोणतेही सरकारी वा नीमसरकारी अनुदानाची मदत हे नाटक घेत नाही. स्वावलंबन हे पूर्णत्वे आहे.

आज जिथे एका पाकिटासाठी कलाकाराला थांबून राहावे लागते किंवा वाट पाहावी लागते तिथे ‘प्रेक्षक सहयोग’ हाच खरा सहयोग आहे, जो कलाकाराला खऱ्या अर्थाने भक्कम करतो. त्याच प्रमाणे माणुसकी या संकल्पनेची सुरवात ही संवादापासूनच होते. म्हणूनच जसे प्रेक्षक आणि कलाकार भेटून संवाद साधतात तशी “कला उद्योजकता” ही संकल्पना वाढीस लागते आहे. या कलात्मक संवादांना ‘प्रोफेशनलिझम’ म्हणतात. फक्त पाकीट किती? आणि गल्ला किती भरला, इतकं सीमीत प्रोफेशनलिझम नाही. रंगमंचावर मानवीय मूल्य जपण्यासाठी कलाकार जीव ओतून आपली कला साधना प्रेक्षकांसमोर सादर करतात आणि प्रेक्षकांमध्ये कलासत्व जागवून मानवीय मूल्य प्रस्थापित करतात या प्रक्रियेला “प्रोफेशनलिझम” म्हणतात.
– मंजुल भारद्वाज