रविवार १ ऑक्टोबर रोजी शुभारंभ!
‘वाडा चिरेबंदी’, ‘मग्न तळ्याकाठी’, ‘युगान्त’ ही महेश एलकुंचवार लिखित व चंद्रकांत कुलकर्णी दिग्दर्शित गाजलेली नाट्यत्रयी! या नाट्यत्रयीतून भारतीय संस्कृतीची अनेक रूपं व्यक्त होतात. यातलं ‘युगान्त’ हे तिसरं नाटक दिग्दर्शक चंद्रकांत कुलकर्णी रसिकांसाठी १ ऑक्टोबरला घेऊन येणार आहेत. जीवनानुभव देणाऱ्या या तीनही नाटकांचा सलग ९ तासांचा अविस्मरणीय नाट्यानुभव यानिमित्तानं प्रेक्षकांना लवकरच घेता येईल.

या अभिजात कलाकृतीसाठी कलाकारांनी दिलेल्या पाठिंब्याबद्दल दिग्दर्शक चंद्रकांत कुलकर्णी यांनी यावेळी कलाकारांचे आभार मानले. तसेच याप्रसंगी उपस्थितीत सर्वच कलावंतांनी आपली मनोगतं, अनुभव यावेळी कथन केले. तसचं चांगल्या प्रकल्पाचा भाग होता आलं याचा आनंद ही व्यक्त केला.
या ‘नाट्यत्रयी’चा पहिलावहिला प्रयोग रविवार १ ऑक्टोबर २०१७ ला रवींद्र नाट्यमंदिर प्रभादेवी येथे रंगणार आहे. विशेष म्हणजे या ‘नाट्यत्रयी’चे मोजकेच ११ प्रयोग होणार असून ते दररविवारी सादर होतील. मुंबई- पुण्याशिवाय महाराष्ट्रातल्या अन्य ठिकाणीही प्रयोग करण्याचा निर्माते व दिग्दर्शकांचा मानस आहे. या ‘नाट्यत्रयी’चं ऑनलाईन बुकिंग बुधवार २० सप्टेंबरपासून सुरु झालं असून सलग नाट्य प्रयोगच्या तिकीटांसोबत नाटकाच्या तिनीही भागांची स्वतंत्र तिकीटंसुद्धा साईटवर उपलब्ध करून देण्यात आली आहे. तसेच तिकीट विक्रीच्या दिवसापासून सीझनं तिकिटं बुकिंग काऊंटरवर उपलब्ध होतील.
बदलती एकत्र कुटुंब पद्धती, बदलता काळ, बदलते नातेसंबंध, भावभावनांचा भव्यपट एकाच दिवशी, एकाच थिएटरमध्ये एकापाठोपाठ बघणं म्हणजे नाट्यरसिकांसाठी एक पर्वणीच ठरणार आहे. या नाटकाची निर्मिती ‘जिगीषा’ व ‘अष्टविनायक’ यांची आहे. लेखन महेश एलकुंचवार यांचं असून दिग्दर्शन चंद्रकांत कुलकर्णी यांचं आहे.
निवेदिता सराफ, भारती पाटील, वैभव मांगले, प्रसाद ओक, पौर्णिमा मनोहर, प्रतिमा जोशी, नेहा जोशी, अजिंक्य ननावरे, दीपक कदम, विनिता शिंदे, चिन्मय मांडलेकर, सिद्धार्थ चांदेकर, पूर्वा पवार, राम दौंड आणि बालकलाकार स्वानंद शेळके या कलाकारांच्या यात भूमिका आहेत. नेपथ्य प्रदीप मुळ्ये तर संगीत आनंद मोडक, राहुल रानडे यांचं आहे. प्रकाश योजना रवी रसिक यांची आहे. वेशभूषा प्रतिमा जोशी, भाग्यश्री जाधव यांची आहे. दिलीप जाधव व श्रीपाद पद्माकर याचे निर्माते असून सहनिर्माते अर्जुन मुद्दा व संज्योत वैद्य आहेत. जीवनानुभव देत वास्तवाचा ठाव घेणारी ही ‘नाट्यत्रयी’ निश्चितच एक अविस्मरणीय नाट्यानुभव देऊन जाईल.