दिग्गजांच्या उपस्थितीत चर्चासत्र संपन्न
‘प्रबोधक’ आणि ‘संस्कार भारती’ कोंकण प्रांत यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘लेखकांचे अधिकार’ या विषयावरील चर्चासत्र १७ सप्टेंबर २०१६ रोजी अस्मिता विद्यालय जोगेश्वरी पूर्व येथे दिग्गजांच्या उपस्थितीत संपन्न झाला. या वेळी प्रबोधक नाट्यवलयतर्फे घेण्यात आलेल्या एकांकिका लेखन स्पर्धेचे पारितोषिक वितरण समारोह पार पडला.
एडव्होकेट दीपक परमार यांचे कॉपीराईट आणि लेखक या विषयावर छोटेखानी व्याख्यान झाले. अनेक गाजलेल्या हिंदी चित्रपटांच्या लेखिका मनीषा कोरडे, हिंदी मालिका लेखक आकाश आदित्य लामा, लेखक, दिग्दर्शक व अभिनेते अभिराम भडकमकर, नाट्य दिग्दर्शक विश्वास सोहनी आणि ज्येष्ठ लेखक व उद्योजक जयराज साळगांवकर अशी दिग्गज आणि मातब्बर मंडळी यावेळी उपस्थित होती.
लेखक कोणाला म्हणावे? लेखकांनी आपले अधिकार जपण्यासाठी कोणती काळजी घ्यावी? सेन्सॉर बोर्ड असावा की असू नये? न्याय मागताना लेखकाने कोणते मुद्दे लक्षात घ्यायला हवे? अशा विविध विषयांवर या दिग्गजांनी प्रकाश टाकला. सर्व दिग्गजांनी त्यांचे अनुभवकथनही मांडले.
या चर्चासत्राचा व्हिडिओ लवकरच सोशल साईट्सवर प्रदर्शित करण्यात येणार आहे. याप्रसंगी प्रबोधक प्रकाशित जयेश शत्रुघ्न मेस्त्री लिखित ‘स्वप्न-दोष’ या गुप्तहेरकथेच्या पुस्तकाचे प्रकाशन ज्येष्ठ कलाकार, भाषा व संभाषण प्रशिक्षक आणि नाट्य सेन्सॉर बोर्डचे सदस्य श्यामराव जोशी यांच्या हस्ते झाले. श्यामराव जोशी या कार्यक्रमाचे अध्यक्ष होते. त्यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात सर्व मुद्द्यांचे व्यवस्थित विवेचन केले. प्रबोधकचे अध्यक्ष हर्षद माने यांनी प्रास्ताविक मांडले.
‘महाराष्ट्रातील तरुण राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर सर्वोच्च स्थानी जावा यासाठी ‘प्रबोधक’ प्रयत्न करीत आहे. प्रबोधकच्या या उद्दिष्टयांची मूर्तिमंत उदाहरणे आज चर्चासत्राला उपस्थित आहेत”, असे मनोगत हर्षद माने यांनी व्यक्त केले.
अनघा मोडक यांनी चर्चासत्राचे सुत्रसंचालन केले. या प्रसंगी एकांकिका लेखन स्पर्धेचे परिक्षक संभाजी सावंत, अभिनेते व दिग्दर्शक अनिल गवस, अस्मिता विद्यालयाचे माजी शिक्षक व प्राध्यापक दिलिप माने, संस्कार भारतीचे डॉ. शिरीष ठाकूर, माधुरीताई शेंबेकर, श्रीहरी कुलकर्णी आणि जगदिश निशाद आदि मान्यवर उपस्थित होते.
‘प्रबोधक’ एकांकिका लेखन स्पर्धेत ‘आधे-अधुरे’ प्रथम
प्रबोधक आयोजित एकांकिका लेखन स्पर्धा २०१६चा निकाल १७ सप्टेंबर रोजी जाहीर करण्यात आला. सांगली येथील इरफान मुजावर यांना प्रथम क्रमांक तसेच ऋषिकेश तुराई यांचा द्वितीय क्रमांक आला. रत्नागिरीच्या अमोल रेडीज तृतीय क्रमांक मिळाला. याशिवाय, तीन उत्तेजनार्थ पारितोषिके देण्यात आली. महाराष्ट्रभरातून या स्पर्धेस भरघोस प्रतिसाद लाभला होता. या निमित्ताने ‘लेखकांचे अधिकार’ या विषयावर एक उत्तम परिसंवाद आयोजित करण्यात आला होता. परिसंवादात, मनिषा कोरडे, अभिराम भडकमकर, जयराज साळगावकर, आकाश आदित्य लामा आणि विश्वास सोहनी या नामांकित लेखक- दिग्दर्शकांनी सहभाग घेतला होता. एडव्होकेट दीपक परमार यांचे ‘कॉपीराईट कायद्यावर’ व्याख्यान झाले. कार्यक्रमाचे अध्यक्ष शामराव जोशी, विश्वास सोहनी, अभिनेते अनिल गवस, अभिराम भडकमकर यांच्या हस्ते पारितोषिके देण्यात आली.
एकांकिका लेखन स्पर्धेचा निकाल
प्रथम पारितोषिक : इरफान मुजावर : आधे-अधुरे
द्वितीय पारितोषिक : हृषीकेश तुराई : मानस
तृतीय पारितोषिक : अमोल रेडीज : गुजरे हुए दिन
उत्तेजनार्थ :
प्रशांत नाईक : द रियल हिरो
उदय गोडबोले : चार कि चाळीस
श्रीकांत करंगुटकर : सत्वपरीक्षा