एकाच कलादालनात पाच रंगलेखकांच्या कलाकृती
पाच सुप्रसिद्ध चित्रकारांचं ‘रंग अध्यात्म’ हे समूह चित्रप्रदर्शन मुंबईच्या नेहरू सेंटर आर्ट गॅलरीमध्ये २७ सप्टेंबरपासून सुरु होणार असून ते ३ ऑक्टोबरपर्यंत सुरु राहणार आहे.
उत्तम चापटे (मुंबई), गजराज चव्हाण (पुणे), श्याम शर्मा (पटना), सुप्रिया वडगावकर (पुणे) आणि अनिल गायकवाड (भोपाळ) अशा देशातील विविध प्रदेशातील चित्रकारांची कला या प्रदर्शनात एकाच कलादालनात पाहता येणार आहे.
आपल्या सर्व कला या सौदर्याला वाहिलेल्या आहेत. कलाकृती फक्त मनाला आकृष्टच करीत नाहीत तर त्या म:नशांतीही देतात. जीवनात अनेक प्रकारचे रंग भरण्याचं काम या कलाकृतीच तर करीत आल्या आहेत. कलेमुळे अंतर्मनातील वेदना, व्दंव्द आणि दु:खच दूर होतं असं नाही तर मनाच्या रितेपणाला लगाम घालण्याचं काम करीत असतात.
‘रंग अध्यात्म’ या चित्रप्रदर्शनातील चित्रं मनाला सुखद समाधान देतात. समकालिन चित्रशैलीचे अनेक आयाम या प्रदर्शनाला लाभले आहेत.
श्याम सुंदर शंर्मांच्या कलाकृती भूतकाळ आणि भविष्याला गवसणी घालतात. कॅलिग्राफीच्या माध्यमातून पुराण काळातील घटनांचा बंध त्यानी बांधला आहे.
अनिल गायकवाड निसर्गाला आपल्या कलाकारीने साकार करतात. जे दिसतं तेवढंच निसर्गविश्व नसून त्या पलिकडेही काही छटा आहेत आणि त्या सामोर्या आणण्याचं काम त्यानी केलं आहे.
सुप्रिया वडगावकर यांच्या कलाकृती या स्त्री आकार असून स्त्रीची सुंदरता, तीच्यातून अव्याहत प्रवाहीत होत रहाणारी उर्जा, स्वतंत्रता, प्रेम, वात्सल्य आणि अंतर्मनातील वैचारीक व्दंव्द यांचा सुरेख संगम त्यांच्या चित्रांमधून झालेला आढळतो.
गजराज चव्हाण यांच्या चित्रात पारंपारीक आणि आधुनिकतेचा संगम झालेला दिसून येतो. ग्रामिण जीवनातील सौदर्याला त्यानी न्याय दिला आहे. ग्रामिण लोककलांचा सुंदर देखावा चित्रांच्या पार्श्वभूमीवर पहायला मिळतो.
उत्तम चापटे यांची चित्रं पाहताना कॅनव्हासवर रंग पसरत आहेत असा आभास निर्माण होतो. एकाच रंगाच्या अनेक छटा अंतर्मानाला सुखाऊन टाकतात. पहाणार्याच्या अनुभूती आणि चित्तवृत्ती प्रफुल्लीत करण्याची ताकद या चित्रांमध्ये आहेच आहे. बहुआयामी चित्रकलेचा सुंदर गोफ या प्रदर्शनात गुंफला गेला असून कलाकृतींची लय आणि त्यामधून प्रतित होणारं संगीत मनाला स्पर्शून जातं.