अभिनेते शशांक शेंडे यांची खास मुलाखत
राष्ट्रीय पुरस्कारप्राप्त ‘रिंगण’ हा मराठी चित्रपट आजपासून सिनेमागृहांत दाखल होत आहे. त्यानिमित्त या चित्रपटातील मुख्य व्यक्तिरेखा साकारणारे अभिनेते शशांक शेंडे यांच्याशी साधलेला संवाद…
‘रिंगण’ चित्रपटात काम करतानाचा अनुभव कसा होता?
अप्रतिम. २००७ साली जेव्हा पहिल्यांदा ‘रिंगण’ ही संकल्पना मांडण्यात आली तेव्हापासून ते अगदी रेकी, स्क्रिप्ट रायटिंग, सिनेमॅटोग्राफी या सर्व गोष्टींवर आम्ही सर्वांनीच खूप मेहनत घेतली आहे. मनात आलेला तो एक विचार ते चित्रपट उभा राही पर्यंतची प्रत्येक प्रोसेस आम्ही सर्वानी जवळून पाहत, त्यावर आपले विचार मांडत, सोल्युशन्स शोधत आपापली काम करत होता. पण त्यामुळे हा चित्रपट एखादा प्रोजेक्ट न वाटता घरचंच एखादं काम असल्यासारखं खेळी-मेळीच्या वातावरणात पार पडला.
चित्रपटाचे दिग्दर्शक मकरंद माने यांच्याबरोबर काम करतानाचा अनुभव कसा होता? चित्रपटासाठी कोणत्या वेगळ्या प्रकारची तयारी करण्यात आली का?
– रिंगणचे कथाकार आणि दिग्दर्शक मकरंद माने यांचा दिग्दर्शकीय दृष्टीने हा पहिलाच चित्रपट. मी आणि मकरंदने या प्रोजेक्टद्वारे पहिल्यांदाच एकत्र काम केलं. आम्हां दोघांचीही गावं सोलापूरचीचं त्यामुळे तेथील लोकांची जीवनपद्धती, त्यांचे प्रश्न मला आधीपासूनच माहिती होते. जवळ जवळ पाच वर्ष या चित्रपटाच्या प्रेत्यक तांत्रिक बाजूचा प्रत्येकाने डिटेलिंगमध्ये अभ्यास केल्यामुळे कथेचा फ्लो कसा असावा, लोकेशन्स कोणती असावी, नक्की कोणते सीन कसे हवे आहेत ह्याची क्लॅरिटी आम्हां प्रत्येकालाचं होती. त्यामुळे २०१४ मध्ये आम्ही ज्यावेळी खऱ्या अर्थाने आम्ही शूटला सुरवात केली तेव्हा आम्हाला आम्ही काही वेगळा अभिनय वगैरे करतोय असं काहीच वाटलं नाही. प्रामाणिक प्रतिक्रिया शूटिंगच्या दरम्यान येत गेल्या. ह्या सर्व चित्रपटाचं श्रेय चित्रपटाच्या संपूर्ण टीमला जातं. मुख्यत्वे करून मकरंदला कारण एखादा चित्रपट चित्रित करण्यासाठी आपल्याला हवा असलेला पुरेपूर वेळ घेऊन कोणत्याही प्रकारची घाई न करता मग त्याच्या चित्रकारणास सुरवात करणं हा खूप मोठा डिसिजन आहे.
रिंगण चित्रपटातील तुमच्या भूमिकेबद्दल काय सांगाल?
– रिंगण चित्रपटातील माझी भूमिका ही बागायतदाराची नसून ती एक-दोन एकरचा छोटासा जमिनीचा तुकडा असलेल्या जिथून पाटाचं पाणी जायला जागा नाही, स्वतःची विहीर नाही अशा शेतकऱ्याची आहे. त्याचा जमिनीचा तुकडा सावकाराकडे गहाण असतो. बायको वारलेली असते. सोबत त्याचा छोटा मुलगा असतो. घरची हलाकीची परिस्थिती असल्यामुळे पोटापाण्याच्या सोयीसाठी म्हणून हा अनेकदा तेथील लोकं मोठ्या शहरांकडे स्थलांतर करत असताना त्याने पाहिलेलं असतं म्हणून तोही पंढरपूरची वाट धरतो. आणि तिथून त्याचा आणि त्याच्या मुलाचा सुरु झालेला एक नवीन प्रवास आपल्याला पाहायला मिळतो.
चित्रपटातील अबडू म्हणजेच साहील जोशी ह्याचा देखील हा पहिलाच चित्रपट होता. तर त्याच्याबरोबर काम करतानाच अनुभव कसा होता?
– हे बाळ फारचं हुशार आहे. खरंतर तो ऑडिशनसाठी आलाच नव्हता. त्याचा मित्र ऑडिशनसाठी आलेला त्याला सोबत म्हणून हा तिथे आला असताना मकरंद मानेंनी त्याला पाहीलं आणि विचारलं की तुला चित्रपटात काम करायला आवडेल का? ऑडिशन देशील का? तर तो तयारही झाला. एका दिग्दर्शकाच्या नजरेने त्याला पाहताक्षणी हाच तो अबडू हे ओळखलं असावं. साहील खुपचं गोड आहे. मकरंदने १५ दिवस त्याला ट्रेन केलं, मग त्या नंतर मी त्याबरोबर पुन्हा काही दिवस प्रॅक्टिस केली. तो सर्व गोष्टी खूप लगेच शिकतो. आतापर्यंत मी बऱ्याच लहान मुलांबरोबर कामं केली. पण ह्याच्याइतका शांत, समजूतदार मुलगा नाही बघितला.
चित्रपटातील बिहाईंड द सीन्स असलेल्या अबडू आणि शशांक शेंडे या रील लाईफ मधील वडील मुलाचं नातं कसं होतं?
– अरे बापरे, ते शब्दांत व्यक्त करणं थोडंसं कठीणचं जाईल मला, कारण साहील इतका लाघवी आहे की आपण त्याच्या प्रेमातच पडतो. जे काही २०-२५ दिवस एकत्र होतो तेव्हा त्याने कधीच कोणालाही कोणत्याच प्रकारचा त्रास नाही दिला. त्याला घरच्यांची आठवण येतेय, रडू येतंय वगैरे काही नाही. फारचं अप्रूप वाटतं मला त्याचं. साहीलला वास्तविक जीवनात वडील नाहीयेत. परंतु त्या २०-२५ दिवसात मी एकदाचं त्याच्या तोंडून ह्या गोष्टीचा उल्लेख ऐकला. पंढरपुरात शूटसाठी जाताना आम्ही ट्रॅकटर्सनी जायचो, तेव्हा मी तो पुढे बसला तर खडबडीत रस्ते अथवा शेतातून जाताना त्याला काही लागू नये म्हणून मागे घेऊन बसायचो. तेव्हा त्याने फक्त एकदाच मला रिक्वेस्ट केली की, “सर मी ५ मिनिटं पुढे जाऊन बसू का?, माझे बाबा असताना ते मला आमच्या सुमो मध्ये पुढे बसवून फिरवायचे.” मी त्याला “जा जाऊन बस पुढे.” सांगितलं पण अगदी मोजून ५ मिनिटं ते बाळ पुढे जाऊन बसलं आणि मग पुन्हा मागे आलं. इतका निरागस आणि गुणी आहे तो.