‘स्टार प्रवाह’वरच्या ‘गोठ’ या मालिकेचा नायक विलास अर्थात समीर परांजपे आणि ‘आम्ही दोघे राजाराणी’ या मालिकेचा नायक पार्थ अर्थात मंदार कुलकर्णी सध्या एका जगावेगळ्या अनुभवाला सामोरे जाता आहेत. प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेल्या या दोन्ही नायकांची खऱ्या आयुष्यात नुकतीच लग्न झाली असून, महिन्याभराच्या आत पुन्हा हे दोघे बोहल्यावर चढणार आहेत.
अर्थात या मागचे कारणही वेगळे आहे, या दोन्ही मालिकांच्या कथानकातल्या मोठ्या वळणानुसार या दोघांचीही ऑनस्क्रीन लग्न येत्या काही आठवड्यात होत आहेत. बयोआजी आणि तिचा नातू विलास या दोन व्यक्तीरेखा ‘गोठ’ या मालिकेमुळे घराघरात पोहचल्या आहेत, बयोआजी सध्या विलासचे लग्न जुळवण्याच्या विचारात आहेत, बयोआजीच्या व्यक्तीमत्वानुसार त्या हाती घेतात ते काम तडीस नेतात, त्यानुसार विलासचे लग्न कोणाशी होणार याची उत्सुकता प्रेक्षकांना आहे.
‘आम्ही दोघे राजाराणी’मध्ये सध्या पार्थ नाईक आणि मधुरा लेले या जोडीची अतरंगी कुटुंबांच्या कधी विरोधात तर कधी पाठिंब्यावर रंगणारी प्रेमकथा निर्णायक टप्प्यावर आहे. या दोघांच्या प्रेमाचे लग्नात होणारे रुपांतर हा धमाल टप्पा पार्थ अर्थात मंदार कुलकर्णीच्या नुकत्याच झालेल्या लग्नाच्या अनुभवाने विशेष रंगताना दिसतो आहे. स्टार प्रवाहवरचा हा लग्नाचा सीझन प्रेक्षकांना दोन वेगळ्या धाटणीच्या लग्नांचा अनुभव देणारा आहे.