सहा कलाकारांच्या चित्र-शिल्पांचे
३१ ऑक्टोबरपासून समूह प्रदर्शन
मुंबई येथील नेहरू सेंटर आर्ट गॅलरी, वरळी, मुंबई येथे ‘व्हिजन’ या समूह प्रदर्शनात चित्र, शिल्प, ग्राफिक्स कलाकृतींचा समावेश आहे. हे प्रदर्शन ३१ ऑक्टोबरपासून सुरू होणार असून, ते ६ नोव्हेंबर २०२३ पर्यंत कला रसिकांना बघता येईल. कोलकाता येथील प्रसिद्ध कलाकार सुमन कुमार पॉल, अरुप कुमार दास, मृण्मय दास, अरुण पॉल, प्रदिप मंडोलआणि पार्थ प्रतिम गायन यांच्या कलाकृतींचा समावेश या प्रदर्शनात होणार आहे. प्रस्तुत प्रदर्शन म्हणजे नेहरू सेंटर आर्ट गॅलरीत विविध कलाकृतींचा भरगच्च नजराणा असणार कला रसिकांना पहायला मिळणार आहे. पेंटिंग्ज, शिल्पकृती व ग्राफिक्स अशा विविध कलाकृती आनंद कला रसिक या एकाच प्रदर्शनात घेऊ शकतील.
सुमन कुमार पॉल हे गव्हर्नमेंट कॉलेज ऑफ आर्ट अँड क्राफ्ट, कोलकाताचे माजी विद्यार्थी असून ते प्रामुख्याने म्युरल या माध्यमात काम करतात. पदवी पूर्ण केल्यानंतर त्यांनी रवींद्र भरती विद्यापीठातून आपले पदव्युत्तर शिक्षण पेंटिंग या विषयात पूर्ण केले आहे. म्युरल या माध्यमात काम करत असताना सुमन पॉल हे निमशहरी भागातील प्रश्न आणि तेथील जीवनाची गुंतागुंत यासारखे संवेदनशील विषय आपल्या कलाकृतीतून मांडतात. म्युरल या माध्यमाला त्यांनी नवीन प्रयोग करून एका वेगळ्या उंचीवर पोचवले आहे. तेजस्वी आणि मिश्र रंगांचा वापर,आकारांमधील नाट्यमयता, विषयातील नाट्यमयता आणि लयबद्धता हे त्यांच्या कलाकृतींचे वैशिष्ट्य आहे.
अरुप कुमार दास हे गव्हर्नमेंट कॉलेज ऑफ आर्ट अँड क्राफ्ट, कोलकाताचे माजी विद्यार्थी असून ते ऍबस्ट्रॅक्ट माध्यमात कलाकृती तयार करतात. सध्या गव्हर्नमेंट कॉलेज ऑफ आर्ट अँड क्राफ्टच्या उपयोजित कला विभागात ते विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देतात. स्थापत्य हे त्यांच्या कलाकृतीची प्रेरणा आहे. प्रिंट मेकिंग माध्यमात ते प्रामुख्याने काम करतात. लयदार आणि जोरकस रेषा हे त्यांच्या चित्रातील महत्वाचा घटक आहे. स्त्रीत्वाच्या शक्तीची प्रचिती दास यांच्या लयदार रेषेतून येते.
मृणमय दास हे गव्हर्नमेंट कॉलेज ऑफ आर्ट अँड क्राफ्ट, कोलकाताचे माजी विद्यार्थी असून ते फॅब्रिक आर्टिस्ट म्हणून काम करतात. दास हे फॅब्रिक माध्यमात काम करतात. त्यांच्या कलाकृती ऍबस्ट्रॅक्ट असल्या तरी धाग्यांच्या वापरांमुळे कलाकृतीमध्ये लय तयार होते जी बघणार्यांना नेत्रसुखद वाटते . फॅब्रिक माध्यमात करण्यात येणाऱ्या डाईंग, स्टॅम्पिंग, स्क्रीन पैंटिंग, फॅब्रिक क्वील्टिंग अशा वैविध्यपूर्ण पद्धतीनी मृण्मय दास आपल्या कलाकृती तयार करतात. दास हे सध्या गोव्हर्नमेन्ट कॉलेज ऑफ आर्ट अँड क्राफ्ट कोलकाता येथे टेक्सटाईल विभागात विद्यर्थ्यांना शिकवतात.
अरुण पॉल यांनी कोलकाता येथील गव्हर्नमेंट कॉलेज ऑफ आर्ट अँड क्राफ्ट येथून आपले दृश्यकला या विषयात पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले आहे. आपल्या चित्रांमध्ये ते प्रामुख्याने प्रतीकांचा वापर करतात. घन आकारातील पार्श्वभूमीवर ही प्रतीके विरोधाभासी पद्धतीने कॅनव्हासवर उठून दिसतात. पोत आणि विरोधाभासी रंगांचा वापर हे पॉल यांच्या चित्रांचे वैशिष्ट्य आहे.
निसर्ग हा प्रदीप मोंडल यांच्या शिल्पांचा मुख्य घटक आहे. मोंडल यांनी गव्हर्नमेंट कॉलेज ऑफ आर्ट अँड क्राफ्ट येथून आपले शिल्पकलेचे शिक्षण पूर्ण केले आहे. मिनिमलिस्टिक स्वरूपातील प्रदीप यांची शिल्पे ही निसर्गाशी एकरूपतेचा साधा आणि महत्वाचा संदेश देतात. त्यांच्या शिल्पामधील आकार हे अभिनव आहेत आणि निसर्गाशी ताळमेळ साधणारे आहेत.
पार्थ प्रतिम गायन यांची शिल्पे म्हणजे इतिहास आणि निसर्ग यांच्याबद्दल मूक संवाद साधणारे माध्यम होय. पार्थ यांनी कोलकात्याच्या गव्हर्नमेंट कॉलेज ऑफ आर्ट अँड क्राफ्ट मधून वसूल आर्टस् या विषयात पद्युत्तर शिक्षण घेतले आहे. त्याचबरोबर बडोद्याच्या सयाजीराव युनिव्हर्सिटीमधून आर्ट हिस्टरी अँड अस्थेटिक या विषयात एमए पूर्ण केले आहे. त्यामुळे त्यांच्या शिल्पामधून इतिहास आणि निसर्ग या दोहोंचा संगम आढळतो. पार्थ यांची शिल्पे हे दाखवून देतात की सातत्याने ह्रास पावणारा निसर्ग वाचवण्यासाठी प्रयत्न करणे हे समकालीन कलेचे महत्वाचे उद्दिष्ट आहे. त्यामुळे त्यांची शिल्पे हा संदेश देतात की मानव जी प्रचंड निर्मिती करत आहे, विकास घडवत आहे त्याचे उद्दिष्ट हे निसर्गा भिमुख असणे हेच आहे.
चित्र, शिल्प, ग्राफिक्स अशा विविध कलाकृतींचा आस्वाद घेण्यासाठी या प्रदर्शनाला कला रसिकांनी आवर्जून भेट देणे गरजेचे आहे. नेहरू सेंटर गॅलरी येथे हे प्रदर्शन सकाळी ११:०० ते संध्याकाळी ७:०० वाजेपर्यंत रसिकांसाठी विनामूल्य खुले राहील.