दिग्दर्शक मकरंद माने यांची खास मुलाखत
राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित ‘रिंगण’ हा बहुचर्चित सिनेमा आजपासून चित्रपटगृहांत दाखल होत आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शक मकरंद माने यांची ही खास मुलाखत…
दिग्दर्शक म्हणून ‘रिंगण’ तुम्ही दिग्दर्शित केलेला पहिलाचं चित्रपट. या चित्रपट दिग्दर्शनाचा अनुभव कसा होता?
ललित कला केंद्रातून नाटकाचं शिक्षण घेत असताना आम्हाला शिकवलं जायचं की, तुम्हाला तुमचं-तुमचं व्यक्त होता आलं पाहिजे. माध्यम कोणतंही असो, व्यक्त होणं महत्वाचं. तेव्हा मला नुकतीच या चित्रपटाची कल्पना डोक्यात आलेली. यावर खूप चांगला चित्रपट बनू शकतो याची मला खात्री होती; परंतु माझं एक ठरलेलं की जोपर्यंत मला वाटत नाही की आपण डिरेक्टर व्हावं, तोपर्यंत आपण या गोष्टीत हात घालायचा नाही. दिग्दर्शक राजीव पाटील यांच्याबरोबर मी ४ वर्ष सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम केलं. आपण जी शिकण्याची प्रोसेस अनुभवायचं बघतो तेव्हा वेगवेगळ्या लोकांबरोबर काम करणे गरजेचे असते. या काळात इतर तीन चित्रपट सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम केल्यामुळे डिरेक्शनची तांत्रिक बाजू मला माहिती होती आणि गोष्ट कशी मांडायची याचा माझा अभ्यास त्यावेळी वेगळा सुरूच होता. करताना थोडीशी भीती होती कारण आपण जे करतो ते आपल्याला आवडत असतं म्हणूनच करतो पण ते प्रेक्षकांना भावणं खूप गरजेचं असतं.
रिंगण चित्रपटाची कथादेखील तुम्ही स्वतःच लिहिली आहे. तुम्हाला हा विषय कसा सुचला?
मी मूळचा अकलूजचा; पण माझा जन्म पंढरपूरचा, ते माझं आजोळ आहे. बालपणीचे सुट्टीचे सर्व दिवस पंढरपुरताच जगलेले त्यामुळे विठूमाऊलीच्या भेटीच्या ओढीने भारावलेल्या तिच्या लेकराचं अकलूजला भरणारं रिंगण ते टाळ-मुदुंगाच्या गजरात पंढरीत दाखल होणं लहानपणापासून बघत आलेलो आहे. एकदा स्टेशन रोडवरील बस स्टॉपजवळून जाताना माझं लक्ष थोड्या अंतरावर उभ्या असलेल्या एका बाप-लेकाकडे गेलं. ते विचारांच्या कचाट्यात अडकलेले वडील आपल्या मुलाला खांद्यावर घेऊन उभे होते. एका कोपऱ्यात काही बायका उभ्या होत्या. त्यातल्या एका बाईकडे हा लहान मुलगा बघत होता. ते दृश्य बघून माझ्या डोक्यात सतत तो मुलगा असा एक टक त्या स्त्रीकडे का बघत असावा? ते दोघेच येथे का आलेले असावेत? त्या मुलाची आई कुठे असेल? नक्की काय घडत असेल त्यांच्या आयुष्यात? काय विचार करून विठ्ठलाच्याच दारी डोकं टेकण्यास आले असतील? असं नेमकं काय असतं इथे जेणेकरून येथे आलं की लोकांचे प्रॉब्लेम सॉल्व्ह होतात? असे अनेक विचार येऊ लागले. खूप विचार केल्यावर उमगलं की इथे येऊन त्यांचे प्रश्न सुटतं नसून ते सोडवायची शक्ती त्यांना मिळते. मग याच विचारानातून मी ही कथा लिहिण्यास घेतली.
रिंगण चित्रपटाला २०१६ चा नॅशनल फिल्म अवॉर्ड मिळाला आहे आणि तुम्ही त्याचा एक महत्वाचा भाग आहात. त्याबद्दल काय सांगाल?
आपण अशा क्षेत्रात काम करतो जे खूप जास्त ग्लॅमरस आहे. कधी कधी या ग्लॅमरमुळे आपण स्वतःला विसरून जाण्याची अथवा गैरसमजात जगण्याची शक्यता असते. पण आपल्याला आपल्या कामाची खरी पावती देणाया २ गोष्टी आहेत. एक म्हणजे प्रेक्षकांची पाठीवर पडलेली थाप आणि दुसरी म्हणजे आपल्याचं क्षेत्रात आपल्या कलाकृतीला गौरवले जाणे. २०१६ चा नॅशनल फिल्म अवॉर्ड रिंगण चित्रपटाला मिळाल्यामुळे आम्हा सर्वांची मेहनत सार्थकी लागली असल्याचा आणि आपल्या देशाचं नावलौकीक होण्यात आपला खारीचा वाटा असल्याचा मला खूप आनंद आहे. एका इंटरनॅशनल फेस्टिवलमध्ये आपण आपल्या समाजाला, देशाला रिप्रेझेंट करतो याचा अभिमान देखील वाटतो.
शशांक शेंडे आणि साहीलबरोबर काम करतानाच अनुभव कसा होता?
अप्रतिम. खूपच छान. आम्ही तिघांनीदेखील पहिल्यांदाच एकमेकांसमवेत काम केलं. खरंतर रिंगणच्या निमित्ताने आम्ही पहिल्यांदा भेटलो. त्यापूर्वी मी शशांकजींचे बरेचसे चित्रपट बघितलेले. आणि तेव्हाच ठरवलेलं कधी मी स्वतः चित्रपट डिरेक्ट केला तर त्यातील अभिनेते हे शशांकजीचं असतील. खरंच तो चान्स आम्हाला मिळाला. साहिल एव्हढा लहान आणि सुरवातीला आम्हाला सर्वांनाच नवखा होता. पण तो इतका गोड आणि समजूतदार आहे. त्याला ओडिशाच्या वेळी पाहताक्षणी जणू काही माझा अबडूचा शोध पूर्ण झाल्याचा भास झाला. निरागस चेहरा, टपोरे बोलके डोळे. त्याला जे सांगाल, जसं सांगाल सगळं व्यवस्थित लक्ष देऊन ऐकणार आणि तसंच करणार.
“रिंगण, सुटता सुटत नसलेलं” आणि “प्रयत्नांनी सुटेल आणि आत्मविश्वासाने तुटेल” ही रिंगण चित्रपटाच्या पोस्टरवरील वाक्य खूप काही सांगून जातात. त्याबद्दल काय सांगाल?
आईबापाच्या मायेचादेखील विसर पडावा अशा विठूमाऊलीच्या भेटीची ओढ अंतरी ठेवून खांद्यावर पताका, मुखाने हरिनाम आणि टाळ-मुदुंगाच्या गजरात लाखो भक्तजन दरवर्षी पंढरीत दाखल होतात. पंढरपूरचं गाव असल्यामुळे लहानपणापासून ते आत्तापर्यंत माझा विठ्ठलाचा शोध सुरु आहे. गणपती, राम, कृष्ण यांची कथा किती खरी, किती खोटी हा भाग सोडला तरीही ती माहिती तरी आहे पण विठ्ठलाचा महिमा अजूनपर्यंत समजलेला नसल्यामुळे दारं आषाढी-कार्तिकीला इतका लाखो भक्तांचा जनसमूह इथे का येत असावा? असं नेमकं काय आहे इथे? असे प्रश्न मला नेहमी पडत असत. कारण हे भक्त येताना कोणत्यातरी विचारूनी त्रासलेले दिसून यायचे आणि माऊलीच्या चरणी डोकं ठेवून मंदिरातून बाहेर पडताना एक उमेद घेऊन बाहेर पडताना दिसतं असत. अशाच विचारात असताना मला जाणवलं की ते इथे येऊन पाया पडतात म्हणून त्यांचे प्रॉब्लेम्स सुटत नाहीत तर ते सुटावेत म्हणून कराव्या लागणाऱ्या प्रयत्नांसाठीचं बळ त्यांना या मंदिरातील पॉझिटिव्हिटीतून मिळतं. आपल्या प्रत्येकाचं आयुष्य एक प्रकारच्या रिंगणात असकलेलं असतं. ते सोडवायचं की तोडायचं हे आपलं आपल्यालाच ठरवायचं असतं.