झी मराठीवर पहा ‘लोकमान्य – एक युगपुरूष’
जनसामान्यांचा जहाल नेता म्हणून ओळख असलेल्या लोकमान्यांच्या आयुष्यावर आधारित ‘लोकमान्य – एक युगपुरूष’ हा चित्रपट येत्या १५ ऑगस्टला दुपारी १२ वाजता झी मराठीवर प्रसारीत होत आहे. ‘नीना राऊत फिल्मस्’ची निर्मिती असलेल्या या चित्रपटाची प्रस्तुती एस्सेल व्हिजनची आहे तर दिग्दर्शन ओम् राऊत यांचे आहे.
‘स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच’ अशी सिंहगर्जना करून ब्रिटीशांच्या जुलमी सत्तेला हादरवून सोडणारे नेते, भारतीय असंतोषाचे जनक, अभ्यासू पत्रकार, कायदेतज्ज्ञ, थोर समाजसुधारक अशा एक ना अनेक बिरूदावली ज्यांना सन्मानाने आणि आदराने बहाल करण्यात आल्या ते थोर व्यक्तिमत्व म्हणजे लोकमान्य टिळक. कोकणात जन्मलेले बाळ गंगाधर टिळक वयाच्या दहाव्या वर्षी पुण्यात आले. या शहराला आपली कर्मभूमी करत त्यांनी आपल्या प्रखर वाणीने आणि कार्याने भारतीयांच्या मनात देशभक्तीची भावना चेतवली आणि ब्रिटीशांना ‘सळो की पळो’ करून सोडलं.
महापुरूष कालवश झाले तरी त्यांचे विचार हे कालातीत असतात. त्यांचे विचार, त्यांच्या प्रणाली, त्यांची ध्येयधोरणे कधीच कालबाह्य होत नाहीत. काळ कोणताही असो प्रत्येक पिढीसाठी ते विचार तितकेच प्रेरक ठरतात. ‘लोकमान्य – एक युगपुरूष’ या चित्रपटाची कथा जेवढी टिळकांच्या आयुष्याची आहे तेवढीच ती त्यांच्या विचारांची आहे. त्यांचे विचार हाच या चित्रपटाचा केंद्रबिंदू आहे.
त्या काळात जुलमी सरकारच्या विरोधात भाषणे आणि अग्रलेखांच्या माध्यमातून जनतेची बाजू मांडणारा तसेच ब्रिटीश सरकारला रोखठोक प्रश्न विचारणारा नेता आणि संपादक टिळकांच्या रुपात बघायला मिळाला. आपण कोणत्याही महापुरुषांना जयंती, पुण्यतिथी, पुतळे आणि तसबिरीतच अडकवून ठेवतो आणि त्यांच्या कार्याला विसरून जातो. नेमक्या याच मनोवृत्तीवर बोट ठेवत आजच्या पिढीचेही मनोगत मांडणारा “लोकमान्य-एक युगपुरूष” हा चित्रपट आहे.
लोकमान्यांची वैचारिक जडण-घडण, त्यांचा राजकीय-सामाजिक जीवन प्रवास, त्यांचं शैक्षणिक धोरण, ब्रिटीशांविरूद्ध पुकारलेला स्वराज्यासाठीचा लढा, असहकार आंदोलन, चाफेकर बंधूंची शौर्यगाथा या आणि अशा किती तरी ऐतिहासिक घटनांचा पट या चित्रपटातून मांडण्यात आला आहे.
चित्रपटात लोकमान्यांची भूमिका साकारणारे अभिनेते सुबोध भावे म्हणाले की , “नारायण श्रीपाद राजहंसांना बालगंधर्व अशी पदवी देणारे लोकमान्यच होते. यापूर्वी मी बालगंधर्वांची भूमिका साकारली आणि आता मला लोकमान्यांचीही भूमिका साकारायला मिळते यामुळे मी स्वतःला खूप नशिबवान समजतो. मी मुळचा पुणेकर. या शहरातच वाढलो मोठा झालो. लोकमान्यांची कर्मभूमीही पुणेच. लोकमान्यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या भूमीवर जिथे जिथे आपण उभे असू तिथून देशप्रेमाचीच स्पंदने आपल्याला जाणवतात आणि ती जाणवलीच पाहिजेत. या महान युगपुरूषाची भूमिका साकारण्याचे भाग्य मला मिळाले हे मी त्यांचेच आशीर्वाद मानतो. एखाद्या दगडाला शेंदूर लावल्यानंतर त्याला देवपण लाभतं. त्या शेंदुरामागे लोकांची श्रद्धा आणि विश्वास असतो. मी स्वतःला असाच एक दगड मानतो ज्याला अतिशय श्रद्धेने आणि विश्वासाने शेंदूर लावण्याचं काम रंगभूषाकार विक्रम गायकवाड , दिग्दर्शक ओम राऊत आणि संपूर्ण टिमने केलंय. माझ्या या भूमिकेचं श्रेय त्यांचंच आहे. त्यांच्यामुळेच मी लोकमान्य साकारू शकलो.”
या चित्रपटात इतर महत्त्वांच्या भूमिकांमध्ये चिन्मय मांडलेकर, समीर विद्वांस, भरत दाभोळकर आणि प्रिया बापट हे कलाकार आहेत. चित्रपटाचं संगीत अजित-समीर यांचं आहे. यात एकूण पाच गाणी असून ती श्रीरंग गोडबोले, गुरू ठाकूर, अजित परब, गणेश चंदनशिवे, उषा बिजुर यांनी शब्दबद्ध केली आहेत तर शंकर महादेवन, नारायण परशुराम आणि नंदेश उमप यांनी ती स्वरबद्ध केली आहेत.
सुबोधला रंगभूषेतून लोकमान्यांच्या रुपात उतरवण्याचं काम प्रसिद्ध रंगभूषाकार विक्रम गायकवाड यांनी केलं आहे तर वेशभूषा महेश शेरला यांची आहे. कला दिग्दर्शन संतोष फुटाणे यांचे तर संकलन आशिष म्हात्रे आणि अपूर्वा मोतीवाले यांचे आहे. चित्रपटाची कथा-पटकथा ओम् राऊत आणि कौस्तुभ सावरकर यांची आहे.
यावर्षी ‘टाइमपास’,‘फॅंड्री, ‘लय भारी’, ‘डॉ. प्रकाश बाबा आमटे’ आणि ‘एलिझाबेथ एकादशी’ असे एकाहून एक सरस चित्रपट प्रेक्षकांना देणा-या एस्सेल व्हिजनच्या माध्यमातून ‘लोकमान्य – एक युगपुरूष’ हा चित्रपट येत्या १५ ऑगस्टला दुपारी १२ वाजता झी मराठीवर झळकणार आहे.