एलआयसी गेटवे लिटफेस्टमध्ये भारतीय लेखकांचे एकमत
भारतीय प्रादेशिक भाषांतील लेखक व साहित्यिकांचा अतुलनीय मेळावा तिसऱ्या एलआयसी गेटवे लिटफेस्टच्या निमित्ताने दोन दिवसीय कार्यक्रमात अनुभवण्यास मिळाला. या वेळी प्रादेशिक भाषांतील काही प्रसिद्ध लेखकांनी भारतीय भाषा वाङ्मयातील तडजोडी याबद्दल आपापले विचार मांडले. तसेच, भारतीय लेखकांनी इंग्रजी भाषेमध्येही जास्तीत जास्त लिखाण करून आपली संस्कृती परकीय भाषेत न्यावी, यासाठी एकत्रित मेहनत घेण्याची गरज आहे, या विचाराचा यावेळी पुनरुच्चार केला गेला.
भारतीय प्रादेशिक भाषांवर विचारविनिमय करण्यासाठी गेटवे लिटफेस्टचे तिसरे सत्र एनसीपीए कॉम्प्लेक्स येथील टाटा प्रायोगिक सभागृहात 25 व 26 फेब्रुवारी रोजी आयोजित करण्यात आले आहे. या दोन दिवसीय साहित्यिक महोत्सवात 15 भारतीय भाषांमधील 50 लेखक सहभागी झाले आहेत. हा महोत्सव मुंबईतील ´काक्का´ हे त्रेमासिक व पी फॉर सी या जनसंपर्क संस्थेतर्फे आयोजित करण्यात आला आहे. या सत्रात जास्तीत जास्त लेखक व साहित्यिक व्यक्तीमत्वे विविध भाषिक चर्चासत्रांमध्ये सहभागी होणार आहेत. यामध्ये सहभागी होणाऱ्या काही महत्वाच्या उपस्थितांमध्ये बंगाली कादंबरीकार तिलोत्तमा मजुमदार, सुबोध सरकार, सचिन केतकर, मराठी कवयित्री मलिका अमर शेख, मल्याळी लेखिका के. आर. मीरा आणि प्रसिद्ध चित्रपट निर्माते अदूर गोपालकृष्णन यांचा समावेश आहे.
संबळपुरी (कोसली) या लिपीरहित भाषेत कविता लिहीणारे ओरिसी लेखक हलधार नाग यांना यंदा प्रथमच पहिला एलआयसी गेटवे जीवनगौरव पुरस्कार बहाल करण्यात येणार आहे.
भारतीय साहित्य हे खरोखर कितपत भारतीय़ आहे´, या विषयावरील चर्चासत्राचे अध्यक्षपद भुषविणाऱ्या प्रसिद्ध बंगाली लेखक सुबोध सरकार यांनी आपण दोन भिन्न भारतांमध्ये राहत आहोत, या गोष्टीकडे सर्वांचे लक्ष वेधले. ´इंडिया आणि भारत या दोन भिन्न गोष्टी आहेत. पहिला देश हा आधुनिक आणि श्रीमंत आहे तर दुसरा भारत हा गरिबीने ग्रासलेला आहे. या द्वंद्वात अडकल्यामुळे, वैश्विक आणि अमेरिकनाईझ्ड इंग्रजी भाषेने प्रादेशिक भारतीय भाषांवर मात केली आहे,´´ सरकार यांनी सांगितले.
या सत्रात सहभाग घेतलेले प्रसिद्ध चित्रपटनिर्माते अदूर गोपालकृष्णन यांनी महत्वाच्या भारतीय भाषांचे परस्पर भाषांतर गरजेचे आहे, याकडे लक्ष वेधले. ´सखाराम बायंडर यांसारखी महत्वाची मराठी नाटके मल्याळी भाषेत भाषांतरित झाली आहेत. परंतु, मल्याळी भाषेतील महत्वाचे साहित्यही मराठीत येणे गरजेचे आहे. मोठ्या बंगाली साहित्याचे मल्याळी भाषांतर वाचतच मी मोठा झालो. पण, मल्याळी साहित्याचे बंगालीत भाषांतर झाले नाही. यामुळे अन्य भाषिक साहित्यप्रेमींना दुर्दैवाने मल्याळी भाषेतील वाड्.मय समजलेच नाही.´´
प्रत्येकाच्या मातृभाषेवर भर द्यायला हवा, यावर भर देत मल्याळी लेखक एम. मुकुंदन यांनी सांगितले, ´मी मल्याळी भाषेतच स्वप्ने पाहतो आणि ती माझ्या साहित्यात दिसतातही. अमेरिकेतही सांस्कृतिक व भाषिक वैविध्य असले, तरीही सर्व वाड्.मय हे इंग्रजीतच प्रकाशित होते. फ्रान्समध्येही विविध संस्कृतींचे लोक एकत्र राहत असले, तरी त्यांचे साहित्य हे फ्रेंच भाषेतच प्रकाशित होते.´
ज्ञानपीठ पुरस्कार विजेते व गुजराती साहित्यिक रघुवीर चौधरी यांनीही यावेळी आपले विचार मांडले. ´जेव्हा ब्रिटीशांपासून आपण स्वतंत्र झालो, तेव्हा आपण एक अखंड भारत होतो. एकच भाषा व एकच संस्कृती यांनी आपण एकत्र बांधले गेलो होतो. त्यानंतरच्या इतक्या वर्षांत आपण विविध भाषांमध्ये विभागलो गेलो आहोत आणि त्यामुळेच भारतीय भाषांवर इंग्रजीचे वर्चस्व निर्माण झाले आहे. आपल्या प्रादेशिक भाषा ही भारतीय भाषांची असलेली ओळख हळुहळू पुसट होत चालली आहे.´
या सत्राच्या शेवटी, सर्व लेखक व साहित्यिक या निश्कर्षाला पोहोचले की, पाश्चिमात्य जगाला प्रादेशिक भाषा व त्यातील साहित्याचा काहीही गंध नाही आणि त्यामुळे त्यांना भारतीय इंग्रजी लिखाणाबाबत तितकासा आदर वाटत नाही. भारतीय भाषा या संस्कृतीनिहाय बनल्या असून या भाषांच्या इंग्रजी भाषांतरांमध्ये सांस्कृतिक ठेवा जपता येत नाही. प्रादेशिक भाषांतील लिखाणाबाबत राष्ट्रीय पातळीवर जागरुकता निर्माण व्हायला हवी, या वास्तवाशी सर्व साहित्यिकांचे एकमत झाले.