कर्करुग्णांच्या निधी संकलनासाठी चित्रप्रदर्शन सुरु
कर्करुग्णांच्या निधी संकलनासाठी कॅन्सर पेशंट्स एड असोशिएशन (सीपीएए)ने आयोजित केलेल्या ‘कलर्स ऑफ लाईफ’या प्रदर्शनाचे उद्घाटन प्रख्यात अभिनेत्री अमिषा पटेल, गायक रुपकुमार राठोड, गायिका सोनाली राठोड, सीपीएएचे अध्यक्ष वाय. के. सप्रू व रेखा सप्रू, महिंद्रा हॉलीडेसचे अध्यक्ष अरुण नंदा आणि ‘कलर्स ऑफ लाईफ’च्या व्यवस्थापिका आणि सीपीएएच्या विशेष प्रकल्प संचालिका पियाली शाम या मान्यवरांच्या हस्ते कुलाबा येथील वीव्हिंग रूम येथे करण्यात आले.
या उद्घाटनप्रसंगी ज्येष्ठ कलाकार नयना कनोडिया, समीर मोंडाल, बिना अझीझ, अनन्या बँनर्जी, ब्रिंदा मिलर आणि सलवा रसूल यावेळी उपस्थित होते. भारतातील १०० प्रख्यात कलाकारांच्या कलाकृतीं या प्रदर्शनामध्ये आहेत. हे प्रदर्शन ८ ते २० जून २०१५ दरम्यान सकाळी ११ ते रात्री ७ या वेळेत मुंबईत कुलाबा कॉजवे, बाटा शोरूमच्यावर, वोल्टन रोड, चौथा मजला, एलीसीयम मॅन्शन येथील द वीव्हिंग रूम येथे आयोजीत करण्यात आले आहे.
गरजू कर्करोग रुग्णांसाठी निधी संकलन करण्याच्या उदात्त हेतूने आयोजित करण्यात येत असलेल्या या प्रदर्शनात शेकडो प्रख्यात भारतीय कलाकार सहभागी झाले आहेत. अरझान खंबाटा, बाबू झेवियर, बद्री नारायण, बुवा शेटे, चरण शर्मा, गुरचरण सिंग, जयदीप मेहरोत्रा, के एच आरा, ललीता लाजमी, नयना कनोडिया, नीलाद्री पॉल, समीर मोंडाल, संजय भट्टाचार्य, सनातन दिंडा, शुवाप्रसन्ना, सुब्रत गंगोपाध्याय, सुहास रॉय, सुनील दास, टी वैकुंटम, वृन्दावन सोलंकी आदी कलाकारांचा त्यात समावेश आहे.
‘कलर्स ऑफ लाईफ’च्या व्यवस्थापिका आणि सीपीएएच्या विशेष प्रकल्प संचालिका पियाली शाम म्हणाल्या, “गेली दहा वर्षे ‘कलर्स ऑफ लाईफ’ या सीपीएएच्या वार्षिक प्रदर्शनाच्या आयोजनाचा अनुभव आगळाच आहे. मला पूर्ण अशा आहे कि सीपीएए या प्रदर्शनाच्या माध्यमातून कर्करोगग्रस्त मुलांच्या उपचारांसाठी एक चांगला निधी उभा करण्यात यशस्वी होईल.
संस्थेचे अध्यक्ष वाय के सप्रू म्हणतात, “कलर्स ऑफ लाईफ’ हे सीपीएएचा एक सर्वात मोठे आणि प्रतिष्ठेचे आयोजन आहे. या वार्षिक आयोजनाच्या माध्यमातून सीपीएएला एक मोठा निधी जमा करणे शक्य होते. हा निधी वंचित रुग्णांच्या सेवेसाठी आणि उपचारांसाठी वापरला जातो. आमच्या या सेवाभावी आयोजनामध्ये दरवर्षी सहभागी होऊन हातभार लावणा-या सर्व कलाकारांचे आम्ही शतशः आभारी आहोत. आमच्या संस्थेला या कलाकारांकडून असाच प्रतिसाद लाभावा हीच आमची अपेक्षा आहे.”