३ ते ५ फेब्रुवारीदरम्यान होणार १२ नाटय़ कलाकृतींचे सादरीकरण
राज्य शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या वतीने घेण्यात येणा-या १२ व्या बालनाटय़ स्पर्धेची अंतिम फेरी ३ फेब्रुवारीपासून सुरू होणार असून, ती मुंबईतील परळ येथील दामोदर नाटय़ मंदिरात घेण्यात येणार आहे.
राज्यातील वेगवेगळ्या केंद्रांवरून सवरेत्कृष्ट ठरलेली १२ बालनाटय़ या स्पर्धेत सादर होणार असून, ३ ते ५ फेब्रुवारीदरम्यान दररोज सकाळी १०.३० ते ५ या वेळेत ही स्पर्धा होईल. ३ फेब्रुवारीला सकाळी १०.३० वाजता नांदेडच्या अ.भा. मराठी नाटय़ परिषदेचे नाथा चितळे लिखित आणि गोविंद जोशी दिग्दर्शित ‘लास्ट बेंच’ या नाटकाने स्पर्धेची सुरुवात होणार आहे. ३ फेब्रुवारीलाच १२ वाजता सिंधुदुर्गच्या अक्षरसिंधू साहित्य कला मंचचे धनंजय सरदेशपांडे लिखित आणि सुहास वरुणकर दिग्दर्शित ‘क्लोन’ सादर होईल. त्यानंतर २ वाजता नागपूर जिल्हय़ातील ब्राम्हणी शिक्षण प्रसार मंडळाच्या लालबहादूर विद्यालयाचे संजय गायकवाड लिखित-दिग्दर्शित ‘पोस्टर तर ३.३० वाजता अमरावतीच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यालयाचे प्रमोद काळे लिखित आणि स्वप्नील शेळके दिग्दर्शित ‘सरणार कधी तम्’ हे नाटक सादर होणार आहे.
४ तारखेला जळगावच्या ईस्ट खान्देश एज्युकेशन सोसायटीच्या रावसाहेब रुपचंद विद्यालयाचे शैलेश गोजमगुंडे लिखित आणि प्रतिमा याज्ञिक दिग्दर्शित ‘सांबरी’ हे नाटक सकाळी १०.३० वाजता होईल. १२ वाजता रत्नागिरीच्या फाटक हायस्कूलचे शेखर मुळे लिखित आणि दिलीप भातडे दिग्दर्शित ‘स्वातंत्र्य एक प्रश्नचिन्ह’, २ वाजता अमरावतीच्या लोककल्याण बहुउद्देशीय संस्थेचे विशाल तराळ लिखित आणि दीपक नांदगावकर दिग्दर्शित ‘तमसो मा ज्योतिर्गमय’ या नाटकाचा प्रयोग होणार आहे. ३.३० वाजता लातूरच्या मूक-बधिर विद्यालयाचे सुनिता कुलकर्णी लिखित आणि संगीत कुलकर्णी दिग्दर्शित ‘दरवळ आठवणींचा’ प्रयोग सादर होईल.
स्पर्धेच्या शेवटच्या दिवशी ५ फेब्रुवारीला सकाळी १०.३० वाजता वाशीच्या नवी मुंबई म्युझिक अॅण्ड ड्रामा सर्कलचे डी. व्ही. कुलकर्णी लिखित आणि वासंती भगत दिग्दर्शित ‘जिनी मिनीची गोष्ट’ या बालनाटय़ाचा प्रयोग होणार आहे. १२ वाजता बीडच्या संस्कार विद्यालयाचे सतीश साळुंके लिखित आणि दिग्दर्शित ‘झाडवाली झुंबी’ सादर होईल. २ वाजता पुण्याच्या स्नेहललितचे यतीन माझिरे लिखित आणि वैभव नवसकर दिग्दर्शित ‘थेंबाचे टपाल’ सादर होईल. ३.३० वाजता नाशिकच्या विद्या प्रबोधिनी प्रशालेच्या सुजित जोशी लिखित आणि सागर रत्नपारखी दिग्दर्शित ‘म्या बी शंकर हाय’ या नाटकाच्या प्रयोगाने बालनाटय़ स्पर्धेची सांगता होणार आहे.