नारायण राणे, रामदास आठवले आणि नितीन सरदेसाई झी मराठीवर!
झी मराठीवरील लोकप्रिय असलेला आणि महाराष्ट्राच्या घऱाघरात पोहचलेल्या ‘चला हवा येऊ द्या’ या कार्यक्रमात नारायण राणे, रामदास आठवले आणि नितीन सरदेसाई हे नेते सहभागी होणार आहेत. येत्या सोमवारी आणि मंगळवारी म्हणजेच २३ आणि २४ नोव्हेंबरला रात्री ९.३० वा झी मराठीवरून हे विशेष भाग प्रसारित होणार आहेत.
आपल्या राजकीय नेतृत्वाने आणि कर्तृत्वाने जनमाणसांवर आपली छाप सोडणारे आणि राज्यातच नाही तर देशभरात वेगळी ओळख निर्माण केलेले नेते म्हणजे नारायण राणे, रामदास आठवले आणि नितीन सरदेसाई. तीन वेगवेगळ्या राजकीय पक्षांचे हे नेते आपल्या रोखठोक भूमिकेमुळे कायम चर्चेत राहतात. असे हे तीन दिग्गज नेते प्रथमच एखाद्या मनोरंजक कार्यक्रमात एकाच मंचावर एकत्र येणार आहेत.
प्रेक्षकांना भरभरून हसविणारा आणि काही वेळा डोळ्यांच्या कडाही ओला करणारा कार्यक्रम म्हणजे ‘चला हवा येऊ द्या’. थुकरटवाडी गावातील अतरंगी पात्र या कार्यक्रमातून प्रेक्षकांना भेटतात आणि त्यांचं मनोरंजन करत निखळ आनंद देतात. ‘चला हवा येऊ द्या’च्या या मंचावरून या पात्रांना घेऊन आजवर विविध चित्रपट आणि नाटकांची प्रसिद्धी करण्यात आली. ज्यात प्रामुख्याने त्या चित्रपटाच्या किंवा नाटकाच्या कलाकारांचा आणि तंत्रज्ञांचाही समावेश असायचा. याशिवाय काही विशेष भागांमधून अनेक कलाकारांचे, अभिनेत्यांचे अभिनेत्रींचे वेगळे पैलू, अंतरंगही जाणून घेता आले. आजवर सिनेक्षेत्राशी संबंधित व्यक्तिंना भेटण्याची त्यांना जाणून घेण्याची संधी या कार्यक्रमातून प्रेक्षकांना मिळाली पण आता प्रथमच या कार्यक्रमात सहभागी होणार आहेत राजकीय पटलावरील काही मान्यवर व्यक्तिमत्व. येत्या सोमवारी आणि मंगळवारी प्रसारित होणा-या भागात नारायण राणे, रामदास आठवले आणि नितीन सरदेसाई या राजकीय नेत्यांचे काही नवे पैलू ‘चला हवा येऊ द्या’ मधून बघायला मिळणार आहेत.
महाराष्ट्राचं मुख्यमंत्रीपद भूषविलेले नेते म्हणजे नारायण राणे. कोकणभूमीचे सुपुत्र असलेले राणे राज्यात ओळखले जातात ते त्यांच्या बेधडक वक्तव्य आणि निडर वृत्तीमुळे. मुख्यमंत्री असताना अनेक लोककल्याणाचे आणि विकासाचे निर्णय त्यांनी असेच बेधडकपणे घेतले. त्यांच्या याच कार्याच्या आठवणी जाग्या करणारं एक (काल्पनिक) पत्र या भागात ऐकायला मिळणार आहे जे लिहिलंय मुख्यमंत्र्यांचं सरकारी निवासस्थान असलेल्या वर्षा बंगल्यांनं. थुकरटवाडीतील पोस्टमन काका हे पत्र वाचत असताना स्वतः राणेही भावूक झाले होते. यावेळी रंगलेल्या गप्पांमधून राणे यांनी राजकीय जीवनातील संघर्षाच्या आठवणीसोबतच शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यासोबतच्या अनेक आठवणीही सांगितल्या.
कार्यक्रमात धम्माल आणली ती रामदास आठवले यांनी सादर केलेल्या कविता आणि अभिनयाने. खुमासदार राजकीय वक्तव्यांसोबतच आपल्या खुसखुशीत आणि उत्स्फुर्त राजकीय कवितांसाठी प्रसिद्ध असलेल्या आठवले यांनी शोलेतील गब्बरच्या भूमिकेचं एक प्रहसन रंगवलं शिवाय काही कविताही सादर केल्या.
आजच मी पाहिलेलं आहे तुमचं गाव
मीच जिंकणार आहे आजचा डाव
आपल्या दुश्मनावर घालणार आहे मी घाव
कारण आठवले आहे माझं नाव
अशी कविता सादर करताच उपस्थित प्रेक्षकांनी टाळ्यांचा प्रचंड कडकडाट केला.
मराठी अस्मितेचा लढा पुकारणा-या महाराष्ट्र नवनिर्माण सेना या पक्षाचे नेते नितीन सरदेसाई यांच्यासाठी थुकरटवाडीच्या बॅंडने ‘पळते भैय्ये पाहूया मामाच्या गावाला जाऊया’ हे गाणं सादर करत धम्माल उडवून दिली. याशिवाय अनेक गमती जमती या कार्यक्रमात घडल्या आहेत. येत्या २३ आणि २४ नोव्हेंबरला रात्री ९.३० वा. ‘चला हवा येऊ द्या’चे हे विशेष भाग प्रेक्षकांना बघायला मिळतील.