आस्तिक-नास्तिकतेच्या संघर्षाची नवी कहाणी
स्टार प्रवाहवर आस्तिक-नास्तिकतेच्या संघर्षाची नवी कहाणी ‘कुलस्वामिनी’ २२ मेपासून सोमवार ते शनिवार रात्री ८ वाजता प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.
अनाथ असलेल्या आरोहीची देवावर अपार श्रद्धा आहे. ती नेहमी सकारात्मक विचार करणारी मुलगी आहे. कर्मधर्मसंयोगानं, तिची भेट होते पश्चिम महाराष्ट्रातलं मोठं प्रस्थ असलेल्या देवधर कुटुंबाशी. देवी रेणूका माता देवधर कुटुंबाची कुलस्वामिनी आहे. मात्र, पूर्वी घडलेल्या काही घटनांमुळे त्यांच्या घरात देवीला स्थान नाही. ते नास्तिक झाले आहेत. अशातच घरी आलेली आरोही या नास्तिक देवधर कुटुंबाचे विचार बदलून त्यांच्या घरात कुलस्वामिनीला स्थान मिळवून देते का? त्यासाठी तिला काय काय संघर्ष करावा लागतो? त्यासाठी रेणूका मातेची तिला कशी मदत मिळते? देवधर कुटुंबात रेणूका मातेचा प्रवेश होतो का? असं या मालिकेचं कथानक आहे.
सकस कथा, नवा विचार, उत्तम निर्मितीमूल्ये आणि उत्तम स्टारकास्ट ही स्टार प्रवाहच्या मालिकांची वैशिष्ट्यं आहेत. ‘कुलस्वामिनी’ या मालिकेतही आस्तिक-नास्तिकतेच्या संघर्षाची अनवट कहाणी मांडली जाणार आहे.
उत्तमोत्तम मालिका केलेल्या कॅम्स क्लब या निर्मिती संस्थेनं या मालिकेची निर्मिती केली आहे. डॉ. गिरीश ओक, संग्राम साळवी, रश्मी अनपट, प्रसाद जवादे, किशोरी आंबिये, प्रशांत चौडप्पा, हर्षा गुप्ते, प्रसाद पंडित, आशिष कापसीकर अशी उत्तम स्टारकास्ट या मालिकेत आहे.
गिरीश वसईकर या मालिकेचं दिग्दर्शन करत आहेत. या सेरिअलच्या निमित्ताने संग्राम-रश्मी ही फ्रेश जोडी पाहायला मिळणार आहे.