अखिल महाराष्ट्र स्वकुळ साळी समाजाचे ४थे दोन दिवसीय प्रांतिक अधिवेशन नुकतेच वाशी येथे आयोजित करण्यात आले होते. या अधिवेशनाचे उदघाटन माजी मंत्री गणेश नाईक यांच्या हस्ते झाले.
रायगड जिल्हा स्वकुळ साळी समाज संस्था, मुंबई, रत्नागिरी जिल्हा स्वकुळ साळी समाज हितचिंतक मंडळ, मुंबई, रायगड जिल्हा स्वकुळ साळी समाज संस्था, रायगड, अखिल रत्नागिरी जिल्हा स्वकुळ साळी समाज संस्था रत्नागिरी, यांच्या संयुक्त विद्यमाने हे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी अखिल महाराष्ट्र स्वकुळ साळी समाज संस्थेचे स्वागताध्यक्ष डॉ. अशोक दांडेकर, रायगड जिल्हा स्वकुळ साळी समाज संस्थेचे अध्यक्ष अविनाश साळी, अखिल महाराष्ट्र स्वकुळ साळी समाज संस्थेचे अध्यक्ष सोमनाथ कासटकर, अखिल महाराष्ट्र स्वकुळ साळी समाज संस्थेचे सचिव चंद्रकांत हावरे, दे आसरा फाऊंडेशनचे अध्यक्ष श्रीपाद जोशी आदी मान्यवर उपस्थित होते.
उदघाटन प्रसंगी माजी मंत्री गणेश नाईक म्हणाले की, कोणताही समाज संघटीत होणे ही काळाची गरज आहे. जो समाज संघटीत झालेला आहे त्या समाजाची भरभराट झालेली आहे. साळी समाजदेखील भरभराटीच्या मार्गावर आहे.
अधिवेशनाच्या पहिल्या सत्रात सॅटर्डे क्लब ग्लोबल ट्रस्टचे संस्थापकीय विश्वस्त इंजि. माधवराव भिडे, हस्ताक्षरतज्ज्ञ व व्यवसाय प्रशिक्षक विनीत बनसोडे आणि सॅटर्डे क्लब ग्लोबल ट्रस्टचे सचिव नरेन्द्र बगाडे यांनी मार्गदर्शन केले. मेक इन इंडियाचे प्रणेते जगत शाह यांनी थेट श्रीलंकेहून स्काईपे या आधुनिक डिजीटल प्रणालीच्या माध्यमातून उपस्थितांना मार्गदर्शन केले. मेक इन इंडिया म्हणजे फक्त स्वदेशी उत्पादन तयार करणे हा एवढाच उद्देश्य मर्यादीत नसून, आपल्या भारतीय उत्पादनांनादेखील जागतिक बाजारपेठेत स्थान नावलौकिक मिळू शकतो हा आत्मविश्वास निर्माण करणे हा देखील आहे, असे शाह यांनी सांगितले.
दोन मराठी माणसे एकत्र आली की राजकारण वा क्रिकेटवर गप्पा मारतात. मात्र दोन गुजराती माणसे एकत्र आली कि त्यांच्यामध्ये व्यावसायिक संभाषण होते. मराठी माणसाने हे चित्र बदलायला हवे. जर आपल्याला समृद्ध महाराष्ट्र घडवायचा असेल तर मराठी माणसाने उद्योजकतेकडे वळणे आवश्यक आहे. साळी समाजातील तरुणांनी उद्योजकतेकडे वळावे यासाठी उद्योगबोध हे सत्र या प्रांतिक अधिवेशनात घेऊन साळी समाजाने स्तुत्य पायंडा पाडला आहे. इतर ज्ञाती संमेलनात सुद्धा हा कित्ता गिरविला जाईल अशी अपेक्षा आहे, असे मत सॅटर्डे क्लब ग्लोबल ट्रस्टचे संस्थापकीय विश्वस्त इंजि. माधवराव भिडे यांनी व्यक्त केले.
जो समाज आपली परंपरा आधुनिक विचारांसह नवीन पिढीकडे सुपूर्द करतो तो समाज नेहमीच अग्रेसर राहतो. दोन दिवसांच्या या प्रांतिक अधिवेशनात साळी समाजाने नवीन पिढीला विविध कार्यक्रमांद्वारे नवा दृष्टीकोन दिला आहे. हे खरंच अनुकरणीय आहे, असे नवी मुंबईचे महापौर सुधाकर सोनावणे यांनी अधिवेशनाविषयी गौरवोदगार काढले.
चाकरमानी वृत्ती सोडून प्रत्येकाने आपल्यामध्ये असणाऱ्या सुप्त गुणांना वाव द्यायला हवा. कोणाच्या तरी हाताखाली काम करण्यापेक्षा स्वतःचा उद्योग करावा हाच उद्देश समोर ठेऊन या प्रांतिक अधिवेशनाचे आयोजन करण्यात आले होते, असे मनोगत अखिल महाराष्ट्र स्वकुळ साळी समाज संस्थेचे स्वागताध्यक्ष डॉ. अशोक दांडेकर यांनी व्यक्त केले.
उद्योगबोधसह पहिल्या दिवशी स्वकुळ रथयात्रा, महिला मेळावा आणि सांस्कृतिक कार्यक्रमाची रेलचेल होती. दुसऱ्या दिवशीच्या कार्यक्रमाचे उदघाटन नवी मुंबईचे महापौर सुधाकर सोनावणे यांच्या हस्ते झाले. यावेळी ठाण्याचे माजी महापालिका आयुक्त नंदकुमार जंत्रे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. या दिवशी योगसाधना संचालन, श्री जिव्हेश्वर पूजन आणि समाजातील विविध गुणीजनांचा सत्कार करण्यात आला.