चॉकलेट हिरो अशी टॅग असलेला भूषण प्रधान आता ‘भूतकाळ’ या चित्रपटातून आपल्या सर्वांच्या भेटीस येत आहे. त्यानिमित्ताने त्याच्याशी साधलेला संवाद..
भूतकाळ या चित्रपटाच्या कथानकाविषयी तू काय सांगशील?
-अगदी प्रामाणिकपणे सांगायचं झालं तर ‘भूतकाळ’ हा रोमांचक भयपट आहे. केव्हा केव्हा आपल्या ऐकिवात पॅरानॉर्मल गोष्टी येतात. अशा गोष्टींशी साधर्म्य असणारे ‘भूतकाळ’चे कथानक आहे. काहींचा अशा पॅरानॉर्मल गोष्टींवर पूर्ण विश्वास असतो तर काहींचा नसतो. ज्यांचा विश्वास नसतो त्यांचं म्हणणं असं असतं की, आधी त्या गोष्टींचा पूर्ण अनुभव तर येऊ दे… अशाच पॅरानॉर्मल गोष्टींचा अनुभव ‘भूतकाळ’ या चित्रपटातील व्यक्तिरेखांना आल्यावर त्यांच्या आयुष्यात काय काय बदल येतात, ते त्यांच्या आयुष्यातल्या या कसोटीच्या प्रसंगांना कसे सामोरे जातात याचं चित्रण म्हणजे ‘भूतकाळ’
चित्रपटातील तुझ्या भूमिकेविषयी सांग…
मी चित्रपटात ‘अक्षय, नावाच्या युवकाची भूमिका साकारत आहे. कॉलेजमध्ये जाणारा अक्षय हा तरुण, देखणा, प्रेमळ स्वभवाचा असतो. तो महत्त्वाकांक्षी असतो. त्याचा कुठल्याही पॅरानॉर्मल गोष्टींवर कणभरही विश्वास नसतो. प्रत्यक्षात भूषण प्रधानचाही कुठल्याही पॅरानॉर्मल गोष्टींवर विश्वास नाहीये. त्यामुळे चित्रपटात ‘अक्षय’ ही व्यक्तीरेखा साकारणं मला फार कठीण नाही गेलं.
चित्रपटातील सहकलाकारांविषयी सांग…
चित्रपटात ‘अक्षय’च्या प्रेयसीची भूमिका हेमांगी कवीने साकारली आहे. हेमांगी ही स्वतः एक उत्कृष्ट अभिनेत्री आहे. जेव्हा या चित्रपटाच्या नायकाच्या भूमिकेविषयी मला विचारणा झाली होती, तेव्हा मी आधी नायिकेविषयी विचारलं. कारण चित्रपटात नायकाबरोबरीने नायिकाही महत्त्वाची भूमिका साकरत असते. हेमांगी माझी सहनायिका असल्याचं कळताच मी समाधान व्यक्त केलं. कारण चित्रपटात हेमांगी आणि माझं एक वेगळं पेअरिंग आहे. या आधी मी तिला ओळखत होतोच. पण या चित्रपटामुळे आमच्यात एक गाढ मैत्री निर्माण झाली आहे. कारण एकत्र काम करताना मला तिच्याकडून बरंच शिकायलाही मिळालं. कारण हेमांगीला वैविध्यपूर्ण कामं करण्याचा खूप चांगला अनुभव आहे. हेमांगी कवी व्यतिरिक्त चित्रपटात शशिकांत गंधे, किरण नवलकर, संकेत लवंडे, नम्रता जाधव, अशोक पावडे, रमेश गायकवाड याही कलाकारांच्या महत्त्वाच्या भुमिका आहेत. या सर्वांबरोबर काम करताना खूप समाधान मिळालं.
नवोदित दिग्दर्शक अनिल वाघमारे यांच्यासोबत काम करण्याचा अनुभव कसा होता?
-‘भूतकाळ’ हा चित्रपट दिग्दर्शक अनिल वाघमारे यांना कसा बनवायचा होता, त्यावर पूर्णपणे ठाम होते. चित्रपटातले कलाकार हे अनुभवी असल्यामुळे त्यांनी कधीही त्यांची मतं आमच्यावर लादली नाहीत. चित्रपट बनवताना आम्ही सुचवलेल्या बदलांविषयी ते खूपच सकारात्मक होते. एकंदरीत त्याचं आणि माझ्या कामाचं ट्युनिंग खूप छान जमलं.
चित्रपटातील संगीताविषयी काय सांगशील? चित्रपटातील तुझं आवडतं गीत कोणतं?
चित्रपटातील गीतांवर हिंदी संगीतांची छाप आढळते. त्यातील रोमँटिक गीतंही खूपच श्रवणीय झाली आहेत. दोन रोमँटिक आणि एक पिकनिक अशा तीन गीतांनी चित्रपटाचं संगीत सजलं आहे. मला स्वतःला चित्रपटातील ‘नवा इलाज रे…’ हे बोल असणारे रोमँटिक पिकनिक गीत खूप आवडलं आहे. हे गीत जावेद अली याने गायलं आहे. मला हे गीत आवडल्याची दोन कारणं आहेत. एकतर या चित्रपटाच्या गीताचं चित्रिकरण अलिबाग बीचवर झालेलं आहे. हा माझा सर्वात आवडता बीच आहे. दुसरं कारण म्हणजे मी स्वतः रोमँटिक फिल्मचा फॅन आहे आणि एखाद्या भयपटात रोमँटिक गाणं असणं प्रेक्षकांसाठी एक प्रकारे मनोरंजनाची पर्वणीच असते.
या चित्रपटाचं वेगळेपण तू काय सांगशील? हा चित्रपट प्रेक्षकांनी का पाहावा?
-भयपट म्हटल्यावर कुठेतरी तो चित्रपट नक्कीच मनोरंजक ठरतो. ज्यांचा भूता-खेतांवर विश्वास असतो ते नक्कीच त्या भारावलेपणाच्या वातावरणात हा चित्रपट पाहातात, ज्यांचा नसतो ते चित्रपटात वापरलेलं अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा परिणाम यांचा आस्वाद घेत फिल्म पाहतात. तर एकंदरीत भयपट म्हणजे सर्वांसाठी एकप्रकारे मनोरंजनाचा खजिनाच असते आणि ‘भूतकाळ’ हा चित्रपटही प्रेक्षकांसाठी एकप्रकारे मनोरंजक ठरेल. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे कुठेही या चित्रपटातून अंधश्रद्धेला प्रोत्साहन दिलं गेलेलं नाही. प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेण्यासाठी चित्रपटात कुठेही चुकीच्या गोष्टीचं चित्रण केलेलं नाही.
तुझ्या आगामी चित्रपटांविषयी..
‘भूतकाळ’नंतर लगेचच या डिसेंबर महिन्यात माझा आणखी एक चित्रपट प्रदर्शित होत आहे. ‘गुलमोहर’. त्यात मी, मृणमयी देशपांडे आणि चैतन्य चंद्रात्रे अशा आम्हा तिघांच्या चित्रपटात महत्त्चपूर्ण भूमिका आहेत. हल्लीच मी ‘ती आणि इतर’ हा गोविंद निहलानीजींचा चित्रपट केला. त्यात सुबोध भावे, सोनाली कुलकर्णी, अमृता सुभाष, प्रिया बापट, आविष्कार दारव्हेरकर या कसलेल्या, नामवंत कलाकारांसोबत मला काम करता आलं आहे.