तेजस्विनी पंडितचा भक्कम विश्वास
संजय जाधव दिग्दर्शित ‘तू हि रे’ या आगामी चित्रपटात प्रसिद्ध अभिनेत्री तेजस्विनी पंडित मोठ्या श्रीमंत कुटुंबात वाढलेल्या भैरवी भानुशालीची व्यक्तिरेखा साकारतेय. ही व्यक्तिरेखा सिनेरसिकांना नक्की आवडणार असा भक्कम विश्वास तिने दिलेल्या मुलाखतीत व्यक्त केला आहे.
तेजस्विनी ‘तू हि रे’च्या निमित्ताने तू संजय जाधव यांच्या टीममध्ये दाखल झालीस. कसा अनुभव होता हा?
तेजस्विनी : माझी आणि संजय जाधव यांची ओळख तशी फार जुनी आहे. पण ‘तू हि रे’ सिनेमाच्या निमित्ताने आम्ही पहिल्यांदाच एकत्र काम करतोय. एक यशस्वी दिग्दर्शक म्हणून संजय जाधव आज सगळ्यांना माहित आहेत पण संजय दादा एक माणूस म्हणून तितकाच साधा आणि सगळ्यांना सांभाळून घेणारा आहे. त्याला माणसांशी बोलायला त्यांना जपायला खूप आवडतं. एक जिंदा दिल इन्सान म्हणजे संजय दादा. व्हिजनरी डिरेक्टरची प्रत्येक गोष्टीत इनव्हॉलमेंट देखील तितकीच असते. प्रत्येकाला स्वतःची स्पेस आणि त्यांचा वेळ देऊन त्यांच्या सोबत काम करतो.
या सिनेमातील तुझी भूमिका कशी आहे?
तेजस्विनी : या सिनेमात भैरवी भानुशाली ही व्यक्तिरेखा मी साकारतेय. मोठ्या श्रीमंत कुटुंबात वाढलेली ही मुलगी अतिशय अबोल आहे. शब्दांनी व्यक्त होणं तिला जमत नाही. एका वळणावर असताना तिच्या आयुष्यात असं काही घडतं की तिचं आयुष्यचं पालटतं. पण अगदी खरं सांगते संजय दादाने ही भूमिका माझ्याकडून करून घेतली आहे. मी आणि सई थोड्याशा टॉम बॉंईश असल्याने दादा आमच्या पुढे छडी घेऊन उभा राहायचा. मुलींसारखा कसं वागायचं, उभं राहायचं इथपासून त्याने आमची तयारी करून घेतली आहे. त्यामुळे ही ग्लॅमरस भैरवी प्रेक्षकांना नक्की आवडेल.
आतापर्यंतच्या चित्रपटांपैकी तू या सिनेमात खूप ग्लॅमरस दिसतेस त्याबद्दल काय सांगशील, त्याकरिता काही विशेष मेहनत घेतलीस का?
तेजस्विनी : ग्लॅमरस म्हणाल तर इतक्या छान पद्धतीने मला प्रेझेंट केलं आहे की मलाच मी नव्याने सापडली आहे. त्यात सगळ्यात मोठा वाटा आहे तो हर्षदा खानविलकरचा. तिने इतके छान ड्रेस डिझाईन केलेत माझ्यासाठी खरंच मी खूप छान दिसतेय. रंगभूषाकार प्रवीण केळुसकर, केशभूषाकार सुरेखा या सगळ्यांनी माझ्यावर खूप मेहनत घेतली आहे. या सगळ्याला कॅमेराच्या माध्यमातून जगासमोर आणलं ते सिनेमाचे डी.ओ.पी प्रसाद भेंडे. त्यातही महत्वाचं म्हणजे आमच्या सगळ्यांच्या आसपास इतकी पॉझिटीव्हीटी होती की प्रत्येक जण सिनेमा चांगला होण्यासाठी काम करत होते. यातंच सगळं आलं.
सिनेमातील इतर कलाकारांबद्दल काय सांगशील?
तेजस्विनी : सई आणि स्वप्नील दोघेही मराठी सिनेसृष्टीतील आघाडीचे कलाकार मात्र तितकेच नम्र आणि मनमिळावू. स्वप्नील अतिशय ‘हुशार’ कलाकार आहे. सातत्याने शिकत रहाणं हे त्याच्याकसून खास शिकले. देव न करो कधी मी अडचणीत आले तर एक खरा मित्र म्हणून स्वप्नीलची आठवण नक्की होईल तर दुसरीकडे सई एकाच सिनेमातील दुसरी अभिनेत्रीसोबत काम करतेय हे मी कधी अनुभवलच नाही. उलट ती मला काही गोष्टी हक्काने सांगायची. ते फिलिंग काहीसं आईसारखं होतं, जे मलाही आवडयचं.
तुझ्या कामातील वैविध्य नेहमीच सगळ्यांनी पहिलं आहे. भविष्यात येणा-या भूमिकांविषयी तुझ्या काय अपेक्षा आहेत?
तेजस्विनी : हो, आत्ता खरंच मी ठरवलं आहे इथून पुढे माझ्या अभिनयाचा कस लागेल अशाच भूमिका करणार आहे. त्यामुळे एक अभिनेत्री म्हणून मला त्याचं समाधान मिळेल. मग त्या भूमिकेची लांबी किती आहे, सिनेमात किती सीन आहेत याची मला तितकीशी काळजी नाही. मला असं वाटतं ‘तू हि रे’पासून सुरवात झाली आहे. त्याचबरोबर मला अशा सिनेमांमधून प्रेक्षकांपर्यत पोहोचायचं आहे, ज्याची आठवण पुढची अनेक वर्ष राहील.
मालिका आणि नाटकात तुझा वावर काहीसा कमी झालेला दिसतो, काय सांगशील त्याबाबतीत?
तेजस्विनी : मालिका आणि नाटकांमध्ये खरंच माझा वावर कमी झाला आहे. याची मनापासून खंत आहे. आतापर्यंत मी ज्या काही मालिका आणि नाटकं केली त्याची छाप पडली आणि प्रेक्षकांनी त्या भूमिकांच तोंडभरून कौतुक केलं. कालाय तस्मै नमः, लज्जा, एकाच या जन्मी जणू नाटकांमध्ये वैशाली कॉटेज, नांदी यानंतर एक मोठा गॅप पडला आहे. एक दीड महिन्याची सुट्टी घेऊन मी पुन्हा नव्या जोमाने कामाला लागणार आहे. नाटक करताना तुमचा वेळ अतिशय महत्वाचा असतो आणि तोच जर तुम्ही देऊ शकत नसाल तर ते योग्य नाही. मालिकांच्या बाबतीत म्हणाल तर सध्या मालिकांमध्ये नवे चेहरे येतायत आणि प्रेक्षकांना जास्त अपील होतायत. मालिकांमध्ये आलेल्या या नव्या ट्रेंडमध्ये बघूया मला कधी संधी मिळतेय ते.