पुण्यात अभिजित जोग यांच्या पुस्तकाचे प्रकाशन
मराठी माणूस उद्योगविश्वात मोठा झाला आहे परंतु स्वतःचा ब्रँड निर्माण करू न शकल्याने आपला प्रभाव पाडू शकलेला नाही. उद्योग, व्यवसाय कुणीही निर्माण करू शकतो, मात्र ब्रँड निर्माण कारण्यासाठी जिद्द, चिकाटी याबरोबरच हुशारी आवश्यक असते, अशी भावना व्यक्त करत व्यवसायात स्वःतचा ब्रँड निर्माण केलेल्या उद्योजकांनी त्यांच्या ‘ब्रँडनामा’चा प्रवास शनिवारी उलगडला.
निमित्त होते, रसिक आंतरभारती आणि प्रतिसाद कम्युनिकेशन्स यांच्या वतीने अभिजित जोग लिखित ‘ब्रॅंडनामा’ या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्याचे. अभिनेते सचिन खेडेकर यांच्या हस्ते या पुस्तकाचे आणि ई -आवृत्तीचे प्रकाशन झाले. याप्रसंगी सारस्वत बॅंकेचे अध्यक्ष गौतम ठाकूर, परांजपे स्किम्स्चे व्यवस्थापकीय संचालक शशांक परांजपे, चितळे बंधूचे श्रीकृष्ण चितळे आणि पी. एन. गाडगीळ ज्वेलर्सचे सौरभ गाडगीळ या चार ब्रँड निर्माण केलेल्या उद्योजकांशी संवाद साधण्यात आला. या उद्योजकांच्या यशाचे गमक चित्रपट लेखक क्षितीज पटवर्धन यांनी मुलाखतीतून उलगडले.
गौतम ठाकूर म्हणाले, लोकांना वाटते फक्त उत्पादनालाच ब्रँड, जाहिरात करण्याची आवश्यकता असते परंतु हीच बाब सेवा क्षेत्रालाही लागू पडते. जनतेसमोर आपला प्रेझेंस सतत दिसला पाहिजे, तरच लोक आपल्याकडे येतात यामुळे ब्रँडमध्ये गुंतवणूक आवश्यक ठरते.
चितळे म्हणाले, मला एमबीए करायचे होते मात्र त्याकाळी नोकरी करायची असेल तर त्याला महत्व होते, स्वःतच्याच व्यवसायात जायचे तर त्याची काय गरज असे लोकांनी म्हटल्यामुळे मी थेट व्यवसायात आलो. व्यवसाय वृद्धीसाठी ब्रँड आणि ट्रेडमार्क आवश्यक ठरतो.
गाडगीळ म्हणाले, लहानपणापासून दुकानात जायचो. त्याच व्यवसायात जायचे की नाही, हे ठरविले नव्हते. पण मी एमबीएचे शिक्षण घेत असताना, आमच्या व्यवसायात दक्षिण आशिया आणि सिंगापुरमध्ये काही तरी प्रश्न निर्माण झाला आणि तो सोडवायला जाऊ का? असे मी दाजीकाकांना विचारले आणि तेथून मी व्यवसायात उतरलो. ब्रँडचे म्हणाल तर ब्रँडला कोणत्याही मर्यादा नसतात तसेच ते व्यक्तीपासून वेगळा करता येत नाही आणि ब्रॅडिंगमध्ये चांगले किंवा वाईट असे काही नसते.
परांजपे म्हणाले, ‘सचोटी आणि गुणवत्ता हा आमचा वारसा होता. पण नव्या पिढीला आपलेसे करण्यासाठी आम्ही काही दशकापुर्वी ‘प्रेरणा नव्या भारताची’ ही संकल्पना रुजवली. आपली संस्कृती जपलीच पाहिजे, त्यासोबत जगभरातील चांगल्या गोष्टी शिकायला हव्यात. असे फ्यूजन असायला हवे.
सचिन खेडेकर म्हणाले, जाहिरातबाजीला महत्व न दिल्याने आपण मागे पडलो, असे झाले नाही. मात्र प्रभाव पाडण्यात कमी पडलो असे म्हणण्यास वाव आहे.
लेखक अभिजीत जोग यांनी ब्रँडनामा या पुस्तकामागील आपली भूमिका व्यक्त केली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक अनिश जोग आणि योगेश नांदुरकर यांनी केले, तर शैलेश नांदुरकर यांनी आभार मानले.