अंधशाळेच्या विद्यार्थिनींनी केले चित्रपटाचे संगीत प्रकाशन
शनीशिंगणापूरच्या दरवाजे नसलेल्या घरांचा ‘बॅकड्रॉप’ असलेल्या ‘शौर्य’च्या पोस्टरवर वेगवेगळ्या बॉलिवूड नायक-खलनायकांचे मुखवटे आहेत. त्याचे रहस्य काय असा प्रश्न रसिकांच्या मनात असून, या उत्कंठावर्धक मुखवट्यामागील रहस्य ५ ऑगस्टला सिनेमा प्रदर्शित झाल्यानंतरच उलगडणार आहे.
समीर आशा पाटील या नवोदित तरुण दिग्दर्शकाचा, नवलाखा आर्ट्स व होली बेसिल कंबाईनच्या नीलेश नवलखा, विवेक कजारिया आणि सिनेलीला टॉकीजच्या अश्विनी पाटील यांची निर्मिती असलेल्या, राजन आमले सहनिर्मिती ‘चौर्य’ सिनेमाचा संगीत प्रकाशन सोहळा नुकताच मुंबई येथे श्रीमती कमला मेहता अंधशाळा, दादर यांच्या संचालिका सुपर्णा आजगावकर व त्याच शाळेतील काही अंध विद्यार्थिनींच्या हस्ते सिनेमातील कलाकार आणि तंत्रज्ञ मंडळींच्या उपस्थितीत मोठ्या दिमाखात संपन्न झाला.
एक असं आगळंवेगळं ठिकाण जिथे घरांना दरवाजे नाही. तिथल्या लोकांची अशी श्रद्धा आहे की, चोरी करणार्याना देव शिक्षा करतो. परंतु एक दिवस त्या मंदिरामध्ये दरोडा पडतो आणि लोकांच्या श्रद्धेला तडा पोहचतो. अंगावर शहारे आणणार्या आणि रोमांचित करणार्या या रहस्यमय घटनेतून सुरू होतो चोर आणि श्रद्धेचा शोध याविषयाभोवती चित्रपटाचे कथानक गुंफण्यात आले आहे. गेली अडीच वर्ष समीर आणि त्याच्या संपूर्ण टीमने खूप मेहनत घेऊन हा चित्रपट तयार केला आहे. खूपच उत्तम असे संगीत मयुरेश केळकर याने दिले असून तो नक्कीच कौतुकास पात्र आहे. आजवर आम्ही निर्मित केलेल्या प्रत्येक चित्रपटातून प्रेक्षकांना काहीतरी वेगळं देण्याचा प्रयत्न केला आहे. मराठी सिनेसृष्टीच्या इतिहासात पहिल्यांदाच Accessibility Format चा अभिनव प्रयोग या चित्रपटाच्या माध्यमातून आम्ही करणार आहोत. आशय सहस्त्रबुद्धे या आमच्या मित्राने या विषयात पी. एच.डी. केली असून, या चित्रपटासाठी सध्या तो यावर काम करीत आहे. आजवर हा प्रयोग बॉलिवूडमध्येदेखील झाला नसून ‘चौर्य’ चित्रपटाच्या माध्यमातून हा पहिला मान मराठी सिनेसृष्टीला मिळणार असल्याने आम्हाला याचा नक्कीच सार्थ अभिमान आहे. अंध आणि कर्णबधीरांनादेखील या अभिनव प्रयोगामुळे चित्रपटचा आनंद हा सर्वसामान्य लोकांप्रमाणे घेता येईल, असे निर्माते नीलेश नवलखा यांनी सांगितले.
‘चौर्य’ हा माझा पहिला चित्रपट आहे. नीलेश नवलखा आणि विवेक कजारिया यांनी या चित्रपटाच्या निर्मितीमध्ये रस दाखविल्याने तसेच काही क्रिएटिव्ह गोष्टींच्या मार्गदर्शमुळे हा चित्रपट अधिकच रंजक झाला आहे. या चित्रपटाचे आणखीन एक वैशिष्ट्य की हा पहिलाच मराठी चित्रपट आहे ज्याचे चित्रीकरण हे राजस्थान येथील चंबळ येथे करण्यात आले आहे, असे दिग्दर्शक समीर आशा पाटील याने सांगितले.
चित्रपटाची सुरुवात ही आम्ही एकत्रितरीत्या केली होती. त्यामुळे चित्रपटाच्या व्यक्तिरेखांना मी ओळखत होतो. चौर्य चित्रपटाचे थीम सॉँग आम्ही पाहिले तयार केले. त्यानंतर आम्ही चित्रपटातील तीन गाण्याकडे वळलो. सुप्रसिद्ध गायक आदर्श शिंदे, डॉ. गणेश चंदनशिवे आणि गायिका उर्मिला धनगर यांच्या सुमधुर आवाजात ही गाणी रेकॉर्ड करण्यात आली असून शंकरराव धामणीकर, विष्णू थोरे आणि समीर आशा पाटील यांनी या चित्रपटाची गाणी लिहिलेली आहेत. चित्रपटातील तीनही गाणी ही वेगळ्या पठडीतील असून, प्रेक्षकांनादेखील नक्कीच आवडतील अशी मला आशा असल्याचे संगीतकार मयुरेश केळकर याने सांगितले.
चौर्य चित्रपटाची प्रस्तुती नवलाखा आर्ट्स व साधना सिनेमा यांच्या संयुक्त विद्यमानाने केली आहे. अभिनेते किशोर कदम, गणेश यादव, मिलिंद शिंदे, प्रदीप वेलणकर, दिग्विजय रोहिदास, दिनेश लता शेट्टी, जयेश संघवी, तीर्था मुरबाडकर आणि श्रुती कुलकर्णी आदीं कलाकारांच्या या चित्रपटात महत्त्वाच्या भूमिका आहेत.
श्रीशैल हिरेमठ आणि जितेंद्र पंडित यांनी कॅमेरामन म्हणून काम पाहिले असून, केतन माडीवाले याने या चित्रपटाचे संकलन केले आहे. राज ङगर यांचे कलादिग्दर्शन असून भक्ती नाईक व गणेश चंदनशिवे यांनी नृत्यदिग्दर्शक म्हणून काम पाहिले आहे.