जळगावच्या परिवर्तनचे प्रभावी सादरीकरण
राज्य नाटय़ स्पर्धेत सोमवारी जळगावच्या कलावंतांनी ‘अपूर्णाक’ हे नाटक सादर केले. प्रसिद्ध साहित्यिक, नाटककार मोहन राकेश यांच्या हिंदीतील ‘आधे अधुरे’ या अजरामर कलाकृतीचे मराठी भाषांतर म्हणजेच ‘अपूर्णाक’. मानवी स्वभावानुसार मनात असलेल्या स्वप्नवत पूर्णत्वाची चिरफाड करून वास्वत सांगणारे हे नाटक सुमारे ४०–४५ वर्षानंतरही आजचे वाटते. आजच्या मानवीय जगण्याशी नाते सांगते, पुरुषी अहंकारावर आसूड ओढते, लग्नसंस्थेवर आणि संस्कारांवर भाष्य करते. महत्त्वाकांक्षा,स्वप्न हे माणसाच्या जगण्याचे अजरामर आधार आहेत. जेव्हापर्यंत मानवी जीवन आहे तेव्हापर्यंत या महत्त्वाकांक्षा आणि स्वप्नाला मरण नाही. याच महत्वाकांक्षी स्वप्नात एक स्त्री पूर्ण पुरुषाचा शोध घेत असते. तो पूर्ण पुरुष आयुष्यभर शोधत असते. त्यासाठी वाट्टेल ते प्रयत्नही करत असते. तो स्वप्नातला राजकुमार तिला कधीच भेटत नसतो, कारण पूर्ण पुरुष जन्मालाच आला नसतो.
छायाचित्रे : निखिल गोडसे
जळगावच्या ऊर्जा फाऊंडेशनने निर्मिलेल्या या नाटकाचा मराठी अनुवाद शंभू पाटील यांनी केला असून, अमरसिंह राजपूत यांच्या दिग्दर्शनात या नाटकाचे सादरीकरण करण्यात आले. हा रंगमंचीय आविष्कार बघताना मानवी मनातील अंतरबाह्य आंदोलनाची धग आत्ताच्या घडीला धगधगते आहे, याची जाणीव करून देणारी ठरते आणि हे नाटक माणसांच्या स्वप्नांप्रमाणेच अमर झाल्याची अनुभूतीही देते.
हे नाटक एकीकडे एका स्त्रीच्या जगण्याची, तिच्या आशा–आकांक्षांची गोष्ट सांगतानाच पुरुषांच्या अंतर्मनात दडलेल्या विकृतीचेही बुरखे फाडते. नाटकाच्या कथेनुसार एकएक पदर उकलत जातो आणि ही कलाकृती मानवी जीवनाचे मानसशास्त्रीय आणि समाजशास्त्रीय विेषण करून जाते.
जळगावच्या कलावंतांनी हे नाटक सादर करताना सर्व बारकावे ताकदीने मांडले.वेगवेगळ्या पुरुषांची भूमिका साकारणाऱ्या शंभू पाटील यांनी आपल्या वैविध्यपूर्ण अभिनय कौशल्यांची नोंद घ्यायला भाग पाडले. त्यांच्यासोबतच सावित्रीची भूमिका साकारणारी मंजूषा भिडे, प्रतीक्षा जंगम (बिन्नी), मोना तडवी (किन्नी), अमरसिंह राजपुत (अशोक) यांनी आपापल्या भूमिका चोख बजावल्या आहेत. संहितेतील रंगसूचनेनुसार हर्षल पाटील यांचे नेपथ्य, होरिलसिंग राजपुत यांची प्रकाशयोजना, वसंत गायकवाड–पवन शर्मा यांचे पार्श्वसंगीत नाटकाला नेटकेपणाने सादर करण्यासाठी मोलाचे ठरले. सोनाली पाटील यांची रंगभूषा आणि रंजिता राजेशिर्के यांची वेशभूषाही नाटकाच्या निर्मितीमूल्यांना बळ देणाऱ्या ठरल्या आहेत.