राष्ट्रीय पुरस्कारप्राप्त मराठी चित्रपटाचा सिनेरसिकांनीही केला गौरव!
राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त ‘किल्ला’ चित्रपट २६जूनला प्रदर्शित झाला. या चित्रपटाने तीन दिवसात कोटींची उड्डाणे घेत तीन कोटी पंचवीस लाख एवढी कमाई केल्याची माहिती मिळाली आहे. चित्रपटात स्टार पॉवर असलेले कलाकार नसताना, मनोरंजनाचा नेहमीचा मसाला नसताना, सशक्त कथा आणि तेवढ्याच जबरदस्त अभिनयाच्या जोरावर ‘किल्ला’ ने हे यश मिळवलंय, याचा आनंद ‘किल्ला’ लढवणा-या टीम किल्लाला प्रोत्साहित करणारा ठरणार आहे.
पहिल्या आठवड्यात २२५ चित्रपटगृहे आणि तीन हजार शोज् द्वारे प्रेक्षकांच्या भेटीस आलेल्या ‘किल्ला’च्या शोज् मध्ये प्रेक्षकांच्या मागणीतून वाढ झाली आहे. विशेष म्हणजे मुंबई–पुण्यासह कोल्हापूर, औरंगाबाद, नाशिक, लातूर, नागपूरमध्येही ‘किल्ला’ला असाच प्रतिसाद मिळत आहे.
विविध आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवांमध्ये मानाचे पुरस्कार पटकावित असतानाच ‘किल्ला’ने राष्ट्रीय पुरस्कारावरही मोहोर उमटवली. हे यश मिळत असतानाच प्रेक्षकांच्या पसंतीचा पुरस्कार किल्लाला मिळेल का असा प्रश्न अनेकांच्या मनात होता. मात्र पहिल्या तीन दिवसात तीन कोटी २५ लाख एवढी घसघशीत कमाई या चित्रपटाने केल्याचे सांगण्यात येत आहे. ‘किल्ला’च्या कथेबद्दल, यातील बालकलाकारांच्या अभिनयाबद्दल अनेक जाणकार समीक्षकही भरभरून बोलत आहेत.
‘किल्ला’ला मिळालेल्या या यशाबद्दल या चित्रपटाची सहनिर्मिती आणि वितरण करणारे एस्सेल व्हिजनचे बिझनेस हेड निखिल साने म्हणाले की, ‘किल्ला’चं यश हे अनेक दृष्टीने महत्त्वपूर्ण आहे. किल्लाच्या यशाला ‘टाइमपास’ किंवा ‘लय भारी’ या चित्रपटांच्या यशाबरोबर तुलना करणं चुकीचं ठरेल कारण या चित्रपटाची जातकुळी पूर्णपणे वेगळी आहे. यात अमृता सुभाष वगळता इतर कुणीही लोकप्रिय कलाकार नाहीये शिवाय इतर सर्व बाल कलाकार आहेत. त्यामुळे मराठीमध्ये विनोदीपटांना, प्रेमकथांना किंवा अॅक्शन चित्रपटांना मिळणारा प्रेक्षकवर्ग किल्लाकडे वळेल का हा एक प्रश्न होता. या चित्रपटात विनोद आहे पण तो रूढार्थाने विनोदी नाहीये.. प्रेमाची गोष्ट आहे पण ती आई – मुलाच्या नात्याची आहे, मैत्रीची आहे. हा चित्रपट बघताना आपण नकळतपणे आपल्या भूतकाळात हरवून जाऊ आणि तोच या चित्रपटाचा युएसपी ठरेल याबद्दल मनात खात्री होती. मराठी चित्रपटाच्या कक्षा रूंदावतायत असं आपण नेहमी म्हणतो पण ‘किल्ला’मुळे आपला चित्रपट आणि प्रेक्षक हा अधिक प्रगल्भ झालाय असं म्हणता येईल. चित्रभाषेचा एवढा अप्रतिम वापर असणारा हा मराठीतील बहुधा पहिलाच चित्रपट असावा आणि त्याला मिळणारा हा प्रतिसाद हे मराठी चित्रपटक्षेत्रासाठी सकारात्मक चित्र आहे असं मी मानतो. हे यश जेवढं चित्रपटाच्या टीमचं आहे तेवढंच प्रेक्षकांचंही आहे.”