१६ वर्षाच्या यशपूर्तीचा सोहळा साजरा
१६ वर्षांपूर्वीची गोष्ट… तेव्हाच्या ‘अल्फा’ (आताच्या झी मराठी) या वाहिनीवर ‘आभाळमाया’ या मालिकेने सुमारे साडेतीन वर्षांच्या कालावधीत प्रेक्षकांशी आपले नाते विणले, टीआरपीचे विक्रम नोंदविले. त्या यशपूर्तीचा आनंदोत्सव नुकताच मालिकेतील प्रमुख कलाकांरासह लेखक, गीतकार, तंत्रज्ञ यांच्या उपस्थितीत एका शानदार सोहळ्यात साजरा केला. या सोहळ्यात ‘आभाळमाया’च्या नात्यांचा हा कोलाज पुन्हा उलगडण्याचा मानस या सोहळ्यात अच्युत वझे यांनी बोलून दाखवला.
मराठी खाजगी दूरचित्रवाणीच्या इतिहासातलं मानाचं पान अशी ‘आभाळमाया’ची ख्याती आहे. कुटुंबातलं एकमेकांबद्दलचं प्रेम, आनंद, हलकंफुलकं वातावरण आणि वैशिष्टय़पूर्ण व्यक्तिरेखा यामुळे १६ वर्षांपूर्वी ही मालिका अल्पावधीतच लोकप्रिय झाली होती. मराठी घराघरांत आवर्जून बघितली गेली. त्यामुळे तेव्हा या ‘आभाळमाया’त गुंतलेल्या प्रेक्षकांच्या हृदयात आजही आपलं स्थान टिकवून आहे. साधी सरळ कथा, चटकदार संवाद, उत्तम अभिनय, नेटके दिग्दर्शन यामुळे ही मालिका हटके ठरली.
१६ वर्षांपूर्वीच्या आठवणीत प्रत्येक कलाकार आठवणींच्या हिंदोळ्यावर झुलत आपला आभाळमायाचा हृद्य प्रवास उलगडून दाखवत होता. आभाळमाया मालिकेचे दिग्दर्शक विनय आपटे यांची आठवण याप्रसंगी सा-यांनाच जाणवत होती. मालिकेचे संकल्पक आणि निर्माते अच्युत वझे यांनी आपल्या जुन्या आठवणींना उजाळा देत वन ट्री मिडिया या प्रोडक्शन हाऊसच्या माध्यमातून होणारा आपल्या नव्या प्रवासाबद्दलही माहिती दिली.
मालिका, चित्रपट, रंगभूमी, इव्हेंट, डिजिटल व्यासपीठ अशा वेगवेगळ्या प्रातांत वन ट्री मिडिया मुशाफिरी करत उत्तम कलाकृती रसिक प्रेक्षकांसाठी घेऊन येणार आहेत. यातल्या काही प्रकल्पांचा श्रीगणेशा करण्यात आल्याची माहिती वझे यांनी यावेळी दिली. रसिकांना चांगलं काहीतरी देण्याच्या उद्देशाने आभाळमाया मालिकेची निर्मिती केली. आपण जे काही करत आहोत ते चांगलंच आहे हा विश्वास प्रत्येकाने दाखवला त्यामुळेच या मालिकेने रसिकांची मने जिंकली असे सांगत यापुढे वन ट्री मिडियाच्या माध्यमातून अभिरुचीसंपन्न कलाकृती आणण्याचा निर्माते मानस अच्युत वझे यांनी यावेळी बोलून दाखवला.
या मालिकेने अनेक दिग्गज कलाकार मराठी मनोरंजन सृष्टीला दिले. आज मागे वळून पहताना अशी मालिका पुन्हा पहायला मिळावी हा रसिक आग्रह मान्य करत आभाळमायाच्या नात्यांचा हा कोलाज पुन्हा उलगडण्याचा मानस या याश्पुर्तीच्या सोहळ्यात अच्युत वझे यांनी बोलून दाखवला.